परंडा, उमरग्यात युतीची शक्यता, इतरत्र स्वबळ ?
By Admin | Updated: November 11, 2016 00:30 IST2016-11-11T00:32:23+5:302016-11-11T00:30:14+5:30
उस्मानाबाद पालिका निवडणुकीसाठी उमेदारी अर्ज मागे घेण्याचा शुक्रवारी अखेरचा दिवस आहे.

परंडा, उमरग्यात युतीची शक्यता, इतरत्र स्वबळ ?
विशाल सोनटक्के उस्मानाबाद
पालिका निवडणुकीसाठी उमेदारी अर्ज मागे घेण्याचा शुक्रवारी अखेरचा दिवस आहे. त्यामुळे ११ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील आठही पालिका निवडणुकीतील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, शिवसेना, भाजपा युतीसाठीची बोलणी गुरूवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. उमरगा आणि परंडा पालिकेत सकारात्मक बोलणी झाल्याने येथे युतीची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, उर्वरित ठिकाणी शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही पक्ष जवळपास स्वबळ आजमावण्याच्या मनस्थितीत आल्याचे बैठकीअंती स्पष्ट झाले.
राज्यात शिवसेना, भाजपासह महायुतीचे सरकार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांतही राज्य पातळीवर शिवसेना-भाजपाने युतीची घोषणा केली आहे. मात्र, युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याचे या दोन्ही पक्षांनी जाहीर केले होते. त्यानुसार मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील शिवसेना, भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू होत्या. शिवसेनेने प्रारंभीपासून नगराध्यक्षपदाच्या बहुतांश जागांवर दावा ठोकलेला आहे. त्यामुळेच युतीबाबतची बोलणी जिल्हा स्तरावर रेंगाळली होती. शिवसेनेची ही भूमिका शेवटच्या दिवसापर्यंत कायम असल्याचेच दिसून आले.
उस्मानाबाद आणि कळंब या दोन्हीपैकी नगराध्यक्षपदाची एक जागा भाजपाला सोडावी, अशी भाजपाची मागणी होती. मात्र, त्याला शिवसेना उशिरापर्यंत राजी झालेली नव्हती. भाजपाने रात्री उशिरा उस्मानाबादची नगराध्यक्षपदाची जागाही सोडण्याची तयारी दर्शविली. या बदल्यात कळंब, भूम, परंडा यापैकी एक जागा भाजपाला सोडा अशी त्यांची मागणी होती. मात्र, उस्मानाबादसह कळंबमध्ये सेनेचे प्राबल्य असल्याने यापैकी एकही जागा सोडण्यास शिवसेना तयार नव्हती. नगराध्यक्षपदाच्या बदल्यात भाजपाला नगरसेवकपदाच्या जागा जास्तीच्या देऊ, असा सेनेचा प्रस्ताव होता. तो भाजपाला मान्य नव्हता. या सर्व मुद्यांवर उशिरापर्यंत चर्चा झाली. मात्र, कुठलाही ठोस निर्णय न झाल्याने युतीची शक्यता जवळपास मावळल्याचे दिसून आले.
दरम्यान, परंडा आणि उमरगा नगर पालिकेसाठी स्थानिक पातळीवर सेना-भाजपामध्ये युतीसाठीची चर्चा गुरूवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या दोन्ही ठिकाणी अवघ्या दोन-तीन जागांवर मतभेद असल्याचे बैठकीत दिसून आले. मात्र, चर्चेत सहभागी झालेले दोन्ही पक्षातील प्रमुख पदाधिकारी युतीसाठी आग्रही असल्याने या दोन्ही ठिकाणी सेना-भाजपामध्ये युती होण्याची शक्यता बैठकीनंतर कार्यकर्र्त्यांतून व्यक्त होत होती. याबाबतचा निर्णय शुक्रवारी सकाळी जाहीर होण्याची शक्यता आहे. असे असले तरी या दोन्ही ठिकाणी सेना आणि भाजपानेही स्वतंत्रपणे लढण्याचीही तयारी ठेवली आहे. दरम्यान, दोन्ही पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत आम्ही जिल्हाभरात युतीसाठी अजुनही सकारात्मक असल्याचे म्हटले आहे.