पोलिसांनो, खबरदार..! ‘शांताबाई’ वाजवाल तर
By Admin | Updated: December 23, 2015 00:01 IST2015-12-22T23:15:54+5:302015-12-23T00:01:42+5:30
औरंगाबाद : पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोबाईल हे खासगी मालकीचे असले, तरी त्यांच्या रिंगटोनमुळे खात्याची प्रतिमा मलिन होत असते.

पोलिसांनो, खबरदार..! ‘शांताबाई’ वाजवाल तर
औरंगाबाद : पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोबाईल हे खासगी मालकीचे असले, तरी त्यांच्या रिंगटोनमुळे खात्याची प्रतिमा मलिन होत असते. विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी नेमकी ही बाब हेरली आहे. कर्णकर्कश, फिल्मी गाणे तसेच पशू-पक्ष्यांचे आवाज असणाऱ्या रिंगटोन वापरण्यास त्यांनी बंदी घातली आहे.
पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मोबाईलची रिंगटोन हा चर्चेचा विषय बनला आहे. चित्रपटांमधील अश्लील गाणी, पशू-पक्ष्यांचे आवाज, कर्णकर्कश आवाजाच्या रिंगटोन पोलिसांच्या मोबाईलवर वाजत असतात. देशभक्तीपर गीतांच्या रिंगटोन तुरळक पोलिसांकडेच आहेत; परंतु अनेकांचे फोन लावल्यानंतर ‘शांताबाई’पासून ‘इश्क हुआ’सारख्या गाण्यांची ‘रिंगटोन’ वाजत असते. या प्रकारामुळे पोलीस खात्याची प्रतिमा मलिन होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर नांगरे यांनी अखेर बडगा उचलला.
पोलीस दल हे शिस्तप्रिय समजले जात असल्याने अशा गाण्यांच्या रिंगटोन ठेवणे शोभादायक ठरत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी औरंगाबाद शहर वगळता मराठवाड्यातील सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी आदेशच जारी केला आहे. फिल्मी गीते, कर्णकर्कश आवाज तसेच पशू-पक्ष्यांच्या आवाजातील रिंगटोन तातडीने बंद करण्याचा आदेश दिला.