एकनाथ षष्ठी २०२६: तुकाराम बीजेला सुरू झालेला विधी पूर्ण; आंध्र प्रदेशातील भाविकाच्या घागरीने भरला नाथांचा रांजण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 16:48 IST2026-03-07T16:47:28+5:302026-03-07T16:48:25+5:30
पैठण येथील संत एकनाथ महाराजांच्या वाड्यातील पवित्र 'रांजण' भरला; 'श्रीखंड्या'च्या रूपातील सेवेची परंपरा आजही कायम

एकनाथ षष्ठी २०२६: तुकाराम बीजेला सुरू झालेला विधी पूर्ण; आंध्र प्रदेशातील भाविकाच्या घागरीने भरला नाथांचा रांजण
पैठण (जि. छत्रपती संभाजीनगर): संतपरंपरेचा तेजस्वी वारसा लाभलेल्या पैठण नगरीत संत एकनाथ महाराज षष्ठी सोहळ्याचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. या सोहळ्याची अत्यंत भावस्पर्शी परंपरा समजला जाणारा नाथवाड्यातील 'पवित्र रांजण' शनिवारी (७ मार्च) सकाळी भक्तिमय वातावरणात भरला. भगवान श्रीकृष्णाने 'श्रीखंड्या' या रूपात नाथांची १२ वर्षे सेवा केली होती, याच श्रद्धेचे स्मरण या विधीद्वारे दरवर्षी केले जाते.
तुकाराम बीजेपासून विधीला प्रारंभ
या पवित्र परंपरेला तुकाराम बीजेच्या दिवशी प्रारंभ करण्यात आला होता. पुरोहित चंद्रशेखर उपाध्ये व रवींद्र साळ जोशी यांच्या मंत्रोच्चारात आणि नाथवंशज हभप रघुनाथ बुवा गोसावी पालखीवाले यांच्या मार्गदर्शनाखाली हा विधी पार पडला. शनिवारी सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी संतोष विठ्ठलराव कुलकर्णी (मदनुर, जि. कामारेठी, आंध्र प्रदेश) यांच्या घागरीने हा रांजण पूर्ण भरला. यावेळी संतोष कुलकर्णी यांना 'श्रीखंड्या' मानून त्यांचे पारंपरिक पद्धतीने पूजन करण्यात आले.
अशी आहे आख्यायिका
वारकरी संप्रदायानुसार, पांडुरंगाने नाथांच्या सेवेसाठी पैठणमध्ये ३६ वर्षे वास्तव्य केले होते. त्यातील शेवटची १२ वर्षे त्यांनी 'श्रीखंड्या' या नावाने गोदावरीचे पाणी आणून रांजण भरण्याची सेवा केली होती. आजही हा रांजण भरताना तोच भक्तीचा ओलावा अनुभवायला मिळतो. या प्रसंगी रवींद्र पांडव, ज्ञानेश पालखीवाले, योगेश पालखीवाले यांच्यासह मोठ्या संख्येने वारकरी भाविक उपस्थित होते.