सोमवारपासून ‘ऑपरेशन टायगर’ जोमाने, उद्धवसेनेलाला कंटाळलेले करणार शिंदेसेनेत प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 12:02 IST2025-06-06T12:01:37+5:302025-06-06T12:02:02+5:30
संजय राऊत यांनी वर्तवलेले एकही भाकीत खरे ठरलेले नाही. त्यामुळे त्यांना ‘शुभ बोल रे नाऱ्या’ असेच बोलावे लागेल: संजय शिरसाट

सोमवारपासून ‘ऑपरेशन टायगर’ जोमाने, उद्धवसेनेलाला कंटाळलेले करणार शिंदेसेनेत प्रवेश
छत्रपती संभाजीनगर : सोमवारपासून ‘ऑपरेशन टायगर’ जोमाने राबवणार आहे. अनेक जण आमच्यासोबत येण्यास इच्छुक आहेत. विशेषत: उद्धवसेनेला कंटाळून अनेकजण आमच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती शिंदेसेनेचे नेते तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिली.
घाटी रुग्णालयातील जिमखाना इमारतीच्या नूतनीकरणाचे गुरुवारी संजय शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी माध्यम प्रतिनिधींशी पालकमंत्री शिरसाट बोलत हाेते. ते म्हणाले, पावसाळी अधिवेशनापूर्वी नव्हे, आधीपासून आमच्याकडे प्रवेश सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात रोज प्रवेश होत आहेत. मुंबई महापालिकेत ४० पेक्षा अधिक नगरसेवक, अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. ऑपरेशन टायगर हे जोमाने सुरू होत आहे. या सोमवारपासून ज्यांना त्यांच्या पक्षात विचारले जात नाही, असे अनेक लोक उद्धवसेनेला कंटाळून शिवसेनेत प्रवेश करतील. आमचे टायगर एकच आहे, एकनाथ शिंदे. त्यांच्या नेतृत्वात हे प्रवेश होतील. अनेक लोक आमच्याकडे येण्यास इच्छुक आहेत, असेही शिरसाट म्हणाले.
राऊतांचे एकही भाकित खरे ठरले नाही
संजय राऊत यांनी वर्तवलेले एकही भाकीत खरे ठरलेले नाही. त्यामुळे त्यांना ‘शुभ बोल रे नाऱ्या’ असेच बोलावे लागेल. मुंबईचे वाटोळे करणाऱ्यांच्या हातात मुंबई राहणार नाही. ती शिवसेना-भाजपच्या ताब्यात राहील. तुळजापूर येथील ड्रग्ज प्रकरणावरून उद्धवसेनेकडून होत असलेल्या आरोपाविषयी बोलताना संजय शिरसाट म्हणाले, उद्धवसेनेचा काही घडण्यापूर्वी तपास झालेला असतो. यंत्रणा तपासणी करण्याआधीच ते आरोप करून मोकळे होतात. तपासात अडचणी निर्माण करतात.
ठाकरे बंधू एकत्र येणारच नाहीत
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येणार नाही, असेही शिरसाट म्हणाले. राज यांनी महाराष्ट्राची ब्लू प्रिंट केली. पण, ते कधी स्वीकारले गेले नाही, असा टोला शिरसाट यांनी राज यांना लगावला.