‘चेक बाऊन्स’ झाल्यास दीड हजार दंड; महावितरणचा ग्राहकांना झटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 20:06 IST2018-11-30T20:05:57+5:302018-11-30T20:06:26+5:30
वीजग्राहकांना यापूर्वी ३५० रुपये दंड आकारला जात होता.

‘चेक बाऊन्स’ झाल्यास दीड हजार दंड; महावितरणचा ग्राहकांना झटका
औरंगाबाद : वीज दरवाढीनंतर आता वीजबिलाचा भरणा केलेल्या धनादेशाचा कोणत्याही कारणामुळे अनादर (चेक बाऊन्स) झाल्यास ३५० रुपयांऐवजी दीड हजार रुपये दंड किंवा बँक चार्जेस यापैकी जी रक्कम जास्त असेल त्या रकमेचा दंड लावण्यात येणार आहे. महावितरणने ग्राहकांंना दिलेला दुसरा झटका आहे.
वीजदराच्या निश्चितीकरणासाठी दाखल केलेल्या मध्यावधी आढावा याचिकेच्या सुधारित आदेशामध्ये महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने नुकताच हा आदेश दिला असून १ नोव्हेंबरपासून अंमलबजावणीही सुरू केली आहे. औरंगाबाद परिमंडळातील औरंगाबाद व जालना या दोन जिल्ह्यांत जवळपास ९ हजार लघुदाब वीजग्राहक हे दरमहा धनादेशाद्वारे वीज बिल भरणा करतात; परंतु यातील सुमारे साडेतीनशे धनादेश दरमहा विविध कारणांमुळे बाऊन्स होत आहेत. त्यासाठी वीजग्राहकांना यापूर्वी ३५० रुपये दंड आकारला जात होता.
वीजबिल भरण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी ग्राहकांनी दिलेला धनादेश वटणे आवश्यक आहे. त्यानंतरच बिलाची रक्कम प्राप्त झाल्याची नोंद महामंडळाच्या दप्तरी होते; परंतु अनेक वीजग्राहक हे अंतिम मुदतीच्या एक-दोन दिवसांपूर्वी धनादेशाद्वारे वीज बिलाची रक्कम भरतात. धनादेश वटण्यास तीन ते चार दिवस लागू शकतात. त्यामुळे मुदतीनंतर वीज बिलाचा भरणा झाल्यास ग्राहकांना धनादेशाद्वारे भरलेली रक्कम थकबाकी म्हणून पुढील बिलात येते .
ग्राहकांचा कल वाढतोय आॅनलाईन पेमेंटकडे
अलीकडच्या काळात आॅनलाईन वीज बिल भरण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. महावितरणच्या औरंगाबाद परिमंडळांतर्गत सध्या जवळपास दीड लाख वीजग्राहक हे धनादेशाऐवजी दरमहा सुमारे ३० कोटी रुपयांचा वीज बिलाचा भरणा इंटरनेट तसेच मोबाईल अॅपच्या माध्यमातून करीत आहेत.