आता सहनशक्ती संपली, पाणी प्रश्नावरून कारवाई अटळ; महापौरांचा दावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 15:23 IST2018-05-31T15:18:42+5:302018-05-31T15:23:08+5:30

कालपर्यंत प्रशासनाचे तोंडभरून कौतुक करणाऱ्या महापौरांनीही आता विरोधाचा झेंडा फडकावला आहे.

Now the endurance is over, the action on the water question is inevitable; Mayor Claims | आता सहनशक्ती संपली, पाणी प्रश्नावरून कारवाई अटळ; महापौरांचा दावा 

आता सहनशक्ती संपली, पाणी प्रश्नावरून कारवाई अटळ; महापौरांचा दावा 

ठळक मुद्देशहरातील एकाही वॉर्डात समाधानकारक पाणीपुरवठा होत नाही. जिकडेतिकडे पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे.

औरंगाबाद : शहरातील पाणी प्रश्नाने मागील दोन ते तीन दिवसांमध्ये गंभीर वळण घेतले आहे. कालपर्यंत प्रशासनाचे तोंडभरून कौतुक करणाऱ्या महापौरांनीही आता विरोधाचा झेंडा फडकावला आहे. पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे संपूर्ण शहराला वेठीस धरण्यात आले आहे. दोषींवर कोणत्याही परिस्थितीत कारवाई होणार, अशी घोषणा त्यांनी केली. यापूर्वी अनेकदा संधी देऊनही प्रशासनाने पाणीपुरठ्यात कोणतीच सुधारणा केली नाही. ही कारवाई किती दिवसांत होणार यावर महापौरांनी मौन बाळगले.

शहरातील एकाही वॉर्डात समाधानकारक पाणीपुरवठा होत नाही. जिकडेतिकडे पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत महापालिकेत येणारी बहुतांश शिष्टमंडळे पाण्यासाठीच असतात. समाधानकारक पाणी मिळाल्यास नागरिक कशासाठी मनपातील येतील, असा प्रश्नही महापौरांनी उपस्थित केला. बुधवारी दुपारी महापौरांनी शहागंज येथील पाण्याच्या टाकीसंदर्भात बैठक घेतली. यावेळी एमआयएम नगरसेवक उपस्थित होते. शहागंज टाकीवरून तब्बल १८ वॉर्डांतील नागरिकांची तहान भागते. या वॉर्डांना पाच दिवसाआड म्हणून सहाव्या दिवशी पाणी देण्यात येत आहे. शहागंज पाण्याच्या टाकीपर्यंत ७०० आणि १,४०० मि.मी. व्यासाच्या दोन स्वतंत्र जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. 

शहागंज टाकीत मुबलक पाणी साठवून ठेवण्याची क्षमता नाही, एवढे कारण देऊन नागरिकांना तीन दिवसाआड पाणी देण्यास नकार दिला. मनपाने काहीही करून या भागातील नागरिकांनाही ३ दिवसाआडच पाणी द्यावे, असा आग्रह नगरसेवकांनी धरला. महापौरांनीही प्रशासनाला तीन दिवसाआड पाणी मिळालेच पाहिजे. शहरातील विस्कळीत पाणीपुरवठा पूर्ववत करा, असा आदेशही त्यांनी दिला.

Web Title: Now the endurance is over, the action on the water question is inevitable; Mayor Claims