एमआयएमबरोबर यापुढे कधीच निवडणूक समझोता नाही: प्रकाश आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 20:23 IST2021-01-19T20:22:06+5:302021-01-19T20:23:47+5:30
आम्ही स्वतःच्या बळावर निवडणुका लढू शकतो

एमआयएमबरोबर यापुढे कधीच निवडणूक समझोता नाही: प्रकाश आंबेडकर
औरंगाबाद : एमआयएमबरोबर यापुढे कधीच निवडणूक समझोता होणार नाही, हे आज पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
शिकलकरी समाजाच्या मेळाव्यानिमित्त ते औरंगाबादेत आले होते. मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रात हा मेळावा झाला. त्याआधी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. असं काय घडलं की आपण एमआयएमबरोबर कधीच निवडणूक समझोता करणार नाही, या प्रश्नाचे उत्तर द्यायचे त्यांनी टाळले. आम्ही स्वतःच्या बळावर निवडणुका लढू शकतो हे स्वीकारण्याची तुमची मानसिकता का नाही? असा प्रतिप्रश्न त्यांनी पत्रकारांना केला.
नामांतरापेक्षा औरंगाबादच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मला कळीचा वाटतो. महापालिका वंबआच्या ताब्यात दिल्यास दररोज दोन तास पाणी रात्री दहाच्या आत पुरविण्याची खात्री मी देतो. अकोल्यात आम्ही हे करून दाखवले आहे. आहे त्या परिस्थितीत कोणत्याही खर्चाची योजना न राबविता आम्ही औरंगाबादला दररोज दोन तास पाणी पुरविण्याचे आश्वासन देत आहोत, असे आंबेडकर यांनी जाहीर केले.
शिकलकरी समाजाला स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही न्याय मिळाला नाही, त्यांना राहायला हक्काची घरे नाहीत, गुन्हेगारी जमातीचा त्यांच्यावरचा शिक्का पुसला गेला नाही, याबद्दलची खंत त्यांनी व्यक्त केली. किशन चव्हाण, सिद्धार्थ मोकळे, अमित भुईगळ, संदीप शिरसाट यांच्यासह शिकलकरी समाजाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.