ऐतिहासिक देवगिरी किल्ल्याला भीषण आगीचा वेढा; वन्यजीव आणि वारसा धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 13:44 IST2026-03-11T13:42:40+5:302026-03-11T13:44:17+5:30
दरवर्षी देवगिरी किल्ल्याला आग लागते, तरीही उपाययोजना का केल्या जात नाहीत?"

ऐतिहासिक देवगिरी किल्ल्याला भीषण आगीचा वेढा; वन्यजीव आणि वारसा धोक्यात
छत्रपती संभाजीनगर: ऐतिहासिक दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्याला मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग इतकी वेगाने पसरली की, अल्पावधीतच संपूर्ण किल्ल्याला आगीने विळखा घातला. दुरूनच किल्ल्याच्या परिसरातून धुराचे लोट निघताना दिसत असून, या आगीत किल्ल्यावरील वनसंपदा जळून खाक झाली आहे.
वन्यजीवांची होरपळ
आगीमुळे किल्ल्यावर वास्तव्यास असलेले मोर, माकडं आणि इतर पक्षी घाबरून जवळील शेतांमध्ये धाव घेताना दिसले. वाळलेले गवत आणि सोसाट्याचा वारा यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले आहे. आग आता किल्ल्याच्या चारही बाजूंनी पसरली आहे.
आग विझवण्यात तांत्रिक अडचणी
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, किल्ल्याच्या अंतर्गत भागात रस्ते अरुंद असल्याने वाहने पोहोचू शकली नाहीत. परिणामी, पुरातत्व विभागाचे सुरक्षा रक्षक आणि स्थानिक कर्मचारी किल्ल्यावरील पाण्याचा साठा आणि हिरव्या झाडांच्या फांद्यांनी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह
दरवर्षी उन्हाळ्यात देवगिरी किल्ल्यावर अशा आगीच्या घटना घडतात. मागील वर्षी ८ एप्रिलला लागलेली आग तब्बल तीन दिवस धुमसत होती. वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे ऐतिहासिक वास्तूंना मोठा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी इतिहास अभ्यासकांकडून केली जात आहे.