मराठवाड्यास पुन्हा अतिवृष्टीचा फटका; दोन हजार गावे बाधित
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 12:19 IST2025-05-31T12:18:36+5:302025-05-31T12:19:31+5:30
मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पाऊस होत आहे.

मराठवाड्यास पुन्हा अतिवृष्टीचा फटका; दोन हजार गावे बाधित
छत्रपती संभाजीनगर : मे महिन्यात मान्सूनपूर्व पावसाने मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत हजेरी लावली. गेल्या सात दिवसांत दोन हजार गावांच्या परिसरात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पाऊस होत आहे. २९ ते ३० मे या दोन दिवसांतील २४ तासांमध्ये विभागातील बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील १५ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद विभागीय आयुक्तालयाने घेतली आहे.
मागील २४ तासात बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा, चौसाळा आणि धारूर तालुक्यातील मंडलांमध्ये, तर धाराशिव जिल्ह्यात ग्रामीण, तुळजापूर तालुक्यातील सालगरा, परांडाच्या जवळा, भूमच्या माणकेश्वर, भूम, कळंबमधील इटकूर, मोहा, उमरग्याच्या डाळिंब, मुरूम, लोहारा आणि जेवळी मंडलांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली.
जालना जिल्ह्यातील बेथलम येथील संदीप लक्ष्मण परळकर यांच्या मालकीची म्हैस वीज पडून दगावली. तर नसडगाव येथील कैलास साहेबराव मिसाळ यांच्या, गट नंबर १०७ शेतात दोन शेळ्या मृत झाल्या. याशिवाय भोकरदन तालुक्याच्या सोयगाव देवी येथे गट नंबर १६४ मधील प्रल्हाद यादवराव सहाणे यांच्या राहत्या घराची भिंत कोसळली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. सोयगाव देवी येथील गट नंबर १८१ मधील सुमित्रा गणपत सहाने यांची नवीन बांधलेली विहीर खचली. मागील २४ तासात ११.३ मिमी इतका पाऊस झाला. यात सर्वाधिक ४२.२ मिमी पाऊस धाराशिव जिल्ह्यात, तर बीडमध्ये २१ मिमी पाऊस झाला आहे.
मंडलनिहाय झालेला पाऊस (मिमी)
बीड- मांजरसुंबा ७५.२५
चौसाळा ६७.७५
धारूर ६५.७५
धाराशिव ग्रामीण ६५.७५
सालगरा ६७.००
जवळा ७३.५०
माणकेश्वर ७३.५०
भूम ६७.७५
लेट ७७.७५
इटकूर ७५.५०
मोहा ६५.७५
डाळिंब ६५.५०
मुरुम ६५.५०
लोहारा ६७.००
जेवळी ६५.५०