मका पिक कणसाविनाच बहरले; कृषी विभागाचा बियाणे कंपनीवर ठपका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 18:26 IST2019-11-26T18:24:51+5:302019-11-26T18:26:05+5:30
शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीस कंपनी जबाबदार

मका पिक कणसाविनाच बहरले; कृषी विभागाचा बियाणे कंपनीवर ठपका
कन्नड : मधुमकाच्या सदोष बियाणामुळे मक्याच्या पिकला कणसे आली नाहीत परिणामी शेतकऱ्याला आर्थिक फटका बसला. या आर्थिक नुकसानीस बियाणे उत्पादक कंपनी जबाबदार असल्याचा निर्वाळा कृषी विभागाने दिला आहे.
तालुक्यातील हिवरखेडा ( नांदगिरवाडी ) येथील गोकुळ पुंजाबा मगर यांनी सिंजेटा कंपनीचे मधुमका ( शुगर ७५ )बियाणे ( बॅच क्र. १४७६२९७७ व ८०१९७ ) अनुक्रमे २० जुलै व १३ जुलै रोजी सुर्योदय ट्रेडर्स चिकलठाण व श्रमीक कृषी साहित्य कन्नड या दुकानांमधुन बियाणे खरेदी केले होते. नांदगिरवाडी शिवारातील गट नं. २२ मधील ६० आर क्षेत्रावर पेरणी केली. मात्र या मका पिकास कणसे लागलीच नाही. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याने कृषि विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
उपविभागीय कृषी अधिकारी व पं.स. चे कृषी अधिकारी यांच्या समितीने पाहणी करून बियाणात जणुकीय दोष असावा असे मत व्यक्त करून शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीस कंपनी जबाबदार आहे. शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झालेले आहे असा निर्वाळा दिला आहे. तर संबंधित कंपनीकडून नुकसान भरपाईची मागणी करण्यासाठी ग्राहक पंचायतमध्ये प्रकरण दाखल करणार आहे असे गोकुळ मगर यांनी सांगीतले.