औरंगाबादेत महावितरणकडून मान्सूनपूर्व कामांना मिळाली गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 00:26 IST2018-05-21T00:24:45+5:302018-05-21T00:26:00+5:30
वीज ग्राहकांना पावसाळ्यात अखंडित व सुरळीत वीजपुरवठा व्हावा, यासाठी महावितरणने कंबर कसली असून, उन्हाची पर्वा न करता कर्मचारी मान्सूनपूर्व कामाला लागले आहेत.

औरंगाबादेत महावितरणकडून मान्सूनपूर्व कामांना मिळाली गती
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : वीज ग्राहकांना पावसाळ्यात अखंडित व सुरळीत वीजपुरवठा व्हावा, यासाठी महावितरणने कंबर कसली असून, उन्हाची पर्वा न करता कर्मचारी मान्सूनपूर्व कामाला लागले आहेत.
महावितरणने पावसाळ्यापूर्वी वीज यंत्रणा सक्षम करण्यासाठी दर शुक्रवारी शहरातील विविध भागांमध्ये ठराविक वेळेत वीजपुरवठा बंद ठेवून मान्सूनपूर्व कामे हाती घेतली आहेत. यंदा पावसाचे लवकरच आगमन होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर देखभाल, दुरुस्तीच्या कामांनी गती घेतली आहे. पावसात अथवा वादळी वाऱ्याने झाडे किंवा झाडांच्या फांद्या विद्युत वाहिन्यांवर कोसळून त्या तुटण्याच्या घटना घडत असतात. खांब व रोहित्र पडल्यामुळे महावितरणचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान तर होतेच, याशिवाय विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे ग्राहकांनाही मनस्ताप होतो. अनेकदा भूमिगत वाहिन्यांमध्ये पाणी शिरून वीजपुरवठा खंडित होतो. पावसाळ्यातही वीज ग्राहकांना अखंडित व चोवीस तास वीजपुरवठा देण्यासाठी महावितरणने मागील काही दिवसांपासून दर शुक्रवारी वीजपुरवठा बंद ठेवून उच्चदाब व लघुदाब वाहिन्या, रोहित्रांची देखभाल व दुरुस्तीची कामे तसेच डिस्क इन्सुलेटर बदलणे, तारा ओढणे, तारा बदलणे, खांब आणि तारांचे मजबुतीकरण, उपकेंद्र देखभाल, वाकलेले खांब सरळ करणे, गंजलेले, तुटलेले विजेचे खांब बदलणे, ब्रेकर्सची दुरुस्ती, बॅटरी चार्जिंग, आॅईल फिल्टरेशन, तारांजवळील झाडांच्या फांद्यांची छाटणी, फ्युज बदलणे, भूमिगत केबल टाकणे, अनेक वेळा विद्युत उपकेंद्रांमध्ये पावसाचे पाणी साठल्यामुळे वीज यंत्रणेला धोका निर्माण होतो. अशा उपकेंद्रांमध्ये भराव टाकून त्यांची उंची वाढविणे आदी कामेही केली जात आहेत. यासंदर्भात महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांनी औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाच्या औरंगाबाद, जळगाव, लातूर व नांदेड परिमंडळांतर्गत ११ जिल्ह्यांमध्ये सकाळच्या सत्रातच कामे सुरू करावीत व जास्तीत जास्त दुपारी १२ ते १ वाजेदरम्यान पूर्ण करावीत, अशा सूचना दिल्या आहेत.