नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी
By Admin | Updated: May 23, 2014 00:19 IST2014-05-22T23:50:12+5:302014-05-23T00:19:07+5:30
रमेश शिंदे, औसा औसा व लातूर तालुक्याच्या सिमेवर तावरजा मध्यम प्रकल्प आहे़

नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी
रमेश शिंदे, औसा औसा व लातूर तालुक्याच्या सिमेवर तावरजा मध्यम प्रकल्प आहे़ मागील तीन-चार वर्षांपासून या परिसरात पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे सलग दोन वर्षे झाली हा प्रकल्प कोरडा पडला आहे़ तावरजा प्रकल्पात पाणीच नसल्यामुळे या तलावातून शेतकरी मोठ्या प्रमाणात गाळ उपसा करीत आहेत़ गाळाच्या खाली मोठ्या प्रमाणात वाळू निघत असल्याने मोठ्या प्रमाणात त्याची चोरी वाढली आहे़ दोन तालुक्याची हद्द नदीपात्रात असल्यामुळे प्रशासनापुढेही कारवाईचे त्रांगडे आहे़ वाळू चोरी ही रात्रीच्या वेळी होत असल्याचे परिसरातील नागरिक सांगत आहेत़ औसा तालुक्यात मोठ्या नद्या नाहीत़ लातूर व औसा तालुक्याच्या हद्दीवर तावरजा तर औसा व उमरगा लोहारा तालुक्याच्या हद्दीवरून तेरणा अशा दोन नद्या वाहतात़ दोनही नद्यावर निम्न तेरणा व तावरजा मध्यम, असे दोन प्रकल्प आहेत़ निम्न तेरणा प्रकल्पात काही प्रमाणात पाणीसाठा आहे़ तर तावरजा प्रकल्प कोरडा पडला आहे़ तावरजा प्रकल्पामध्ये पाणी नसल्याने मागील वर्षापासून शेतकरी मोठ्या प्रमाणात गाळ उपसा करीत आहेत़ मागील वर्षी जवळपास ५ ते ६ लाख घनमीटर गाळ उपसा झाला होता़ यावर्षीही मोठ्या प्रमाणात शेतकरी गाळ उपसा करीत आहेत़ तावरजा प्रकल्प व नदी पात्रात जवळपास सात ते आठ फूट गाळाचा थर आहे़ या गाळाच्या खालच्या बाजूस अनेक ठिकाणी वाळू निघत आहे़ त्यामुळे तावरजा प्रकल्प व नदी पात्रातील वाळू चोरांना आयतीच संधी मिळत आहे़ तावरजा नदीपात्राच्या आजुबाजूच्या गावामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाळूचे साठे पहायला मिळत आहेत़ अनेक वाळू ठेकेदार प्रशासनाच्या डोळयात धूळफेक करीत दहा-वीस ब्रास वाळूची रॉयल्टी भरतात पण प्रत्यक्षात ५० ते १०० ब्रास वाळू उचलतात़ कोणी पकडले अथवा विचारणा केली तर रॉयल्टी भरल्याचे सांगतात़ लातूर तालुक्यातील अधिकारी आले की औसा तालुक्याच्या हद्दीत पळायचे आणि औसा तालुक्यातील अधिकारी आले की लातूर तालुक्याच्या हद्दीत पळायचे, असे हे वाळूमाफियाचे सत्र आहे़ त्यामुळे कारवाईचे त्रांगडे प्रशासनापुढे उभे टाकत आहे़ यासंदर्भात भादा महसूल मंडळाचे अधिकारी मुगावे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की वाळू उपसा चालू असला की आम्ही दंडात्मक कारवाई केली असल्याचे सांगितले़ यासंदर्भात तहसीलदार दत्ता भारस्कर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की गुरुवारी तावरजा नदीपात्रात पाहणी करून चार वाहनांवर कारवाई केली़ तसेच आता दररोज ही धडक मोहिम राबविण्यात येणार असल्याचे भारस्कर यांनी सांगितले़