औरंगाबाद- इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंटची (आयआयएम) शाखा औरंगाबादेतच येण्यासाठी विभागातील लोकप्रतिनिधी, उद्योजक, व्यापारी आणि शैक्षणिक क्षेत्राच्या प्रतिनिधींबरोबर मी सर्वतोपरी प्रयत्न करीन, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी केले. नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रात एक ‘आयआयएम’ स्थापन करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. ‘आयआयएम’ची ही शाखा औरंगाबादेतच यावी, ही मागणी आता मराठवाड्यातून जोर धरत आहे. या कामी दर्डा यांनी पुढाकार घेऊन सीएमआय या उद्योजकांच्या संघटनेची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी नुकतीच भेट घडवून आणली होती.या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’शी बोलताना शिक्षणमंत्री म्हणाले की, मराठवाड्याच्या विकासासाठी राज्य सरकारने नेहमीच सकारात्मक पावले उचलली आहेत. आर्थिक पॅकेजेस देण्याबरोबरच सिपेट, इंडो जर्मन टूल रूम यांसारख्या संस्था औरंगाबादेत याव्यात म्हणून आम्ही नेहमीच प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रात ‘आयआयएम’ स्थापन होणार, अशी घोषणा झाली त्याक्षणी ही संस्था औरंगाबादेतच यावी, असा पहिला विचार माझ्या मनात आला. डीएमआयसी आणि स्मार्ट सिटी प्रकल्पांमुळे औरंगाबाद एका वेगळ्याच स्तरावर पोहोचणार आहे. आयआयएममुळे शहराच्या प्रतिष्ठेत आणखीनच भर पडेल. त्यामुळेच ही संस्था औरंगाबादेतच यावी, अशी माझी तीव्र इच्छा आहे, असे दर्डा म्हणाले.प्रयत्नांना बळअशा प्रकारचे प्रकल्प खेचून आणण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, असे अनुभव डीएमआयसी, आंतरराष्ट्रीय विमानतळ, अॅटो क्लस्टर आणि स्मार्ट सिटी या प्रकल्पांचा यशस्वी पाठपुरावा करताना मला आले आहेत. शहरातील उद्योजक व व्यापारी यांनी आयआयएमसाठी घेतलेला पुढाकार प्रशंसनीय आहे.या शहराचा लोकप्रतिनिधी व राज्य शासनातील एक मंत्री म्हणून सर्व स्तरांवर आयआयएमसाठी चाललेल्या प्रयत्नांना बळ देण्याची माझी भूमिका राहील. सर्व संबंधितांना बरोबर घेऊन आयआयएम औरंगाबादेत यावी, यासाठी मी पाठपुरावा करीन, अशी ग्वाही शिक्षणमंत्र्यांनी दिली.
आयआयएम औरंगाबादेतच हवे : राजेंद्र दर्डा
By admin | Published: July 28, 2014 12:45 AM