मृत्यूच्या महामार्गावर दरमहा १२८ अपघात; दहा महिन्यांत ‘समृद्धी’ने घेतले १२३ बळी
By विकास राऊत | Updated: October 16, 2023 12:43 IST2023-10-16T12:43:07+5:302023-10-16T12:43:35+5:30
एमएसआरडीसीची यंत्रणा अपघातांच्या सत्रामुळे हताश झाली आहे.

मृत्यूच्या महामार्गावर दरमहा १२८ अपघात; दहा महिन्यांत ‘समृद्धी’ने घेतले १२३ बळी
छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गाचे पहिल्या टप्प्यातील ५०२ कि.मी.चे लोकार्पण होऊन १० महिने तर दुसऱ्या टप्प्यातील ८० कि.मी. मार्गाचे लोकार्पण होऊन सहा महिने झाले आहेत. या दहा महिन्यांत महामार्गावर सर्व मिळून १२८१ अपघात झाले असून त्यात १२३ जणांचा बळी गेला आहे.
पहिल्या टप्प्याचे लोकार्पण ११ डिसेंबर २०२२ राेजी झाले. तर दुसऱ्या टप्प्यातील लोकार्पण २६ मे २०२३ रोजी झाले. सुरुवातीला टायर फुटून अपघात वाढल्यामुळे ताशी वेगाची १५० ही मर्यादा १२० वर आणली गेली. नायट्रोजन हवेचे सेंटर्स सुरू केले. रात्रीच्या प्रवासासाठी रिफ्लेक्टर वाढविले. मदतीसाठी पूर्ण टोलनिहाय यंत्रणा उभारल्याचा दावा करण्यात येत असून एमएसआरडीसीची यंत्रणा अपघातांच्या सत्रामुळे हताश झाली आहे.
रात्री प्रवासासाठी महामार्गावरील सुविधा
रात्री प्रवासासाठी महामार्गावर माहितीचे रिफ्लेट बोर्ड आहेत. रोड संमोहन होत असल्यामुळे रबलिंग सिप टाकल्या आहेत. दर टोल प्लाझाच्या प्रवेशावर १५ कि.मी.अंतरात ते टाकल्यामुळे चालक अलर्ट होतो.
एमएसआरडीसीची यंत्रणा हताश
अपघातांचे सत्र वाढत असल्यामुळे सर्व यंत्रणा हताश झाली आहे. आरोप महामार्गाशी निगडित यंत्रणेवर आहेत. वाहतूक नियमांचे पालन न करता बेलगाममध्ये वाहन चालविल्यामुळे अपघात होत आहेत. ही दुसरी बाजू असताना एमएसआरडीसीवरच सर्व यंत्रणा तुटून पडत असल्याने त्यांची यंत्रणा हताश होत आहे.
जिल्ह्यात किती अपघात?
समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाल्यानंतर आजवर जिल्ह्यात १४ लहान-मोठ्या अपघातांची नोंद झाली असून त्यात १५ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथिमक माहिती आहे. जिल्ह्यात समृद्धी महामार्गाचे अंतर १२० कि.मी.पर्यंत आहे.
१० महिन्यांत महामार्गावर झालेले अपघात
नागपूर ते मुंबईपर्यंत एकूण अपघात १२८१
किरकोळ अपघात ९३२
मोठे अपघात ४१७
एकूण मृत्यू १२३