सावधान! छत्रपती संभाजीनगरमध्ये हायटेक चोरांची टोळी पुन्हा सक्रिय; १५ मिनिटांत कार गायब!
By सुमित डोळे | Updated: February 14, 2026 19:49 IST2026-02-14T19:49:15+5:302026-02-14T19:49:43+5:30
टेक्नोसॅव्ही चोरांचा छत्रपती संभाजीनगरात धुमाकूळ; रिले बॉक्स आणि सॉफ्टवेअरचा वापर करून लावला 'हायटेक' चुना

सावधान! छत्रपती संभाजीनगरमध्ये हायटेक चोरांची टोळी पुन्हा सक्रिय; १५ मिनिटांत कार गायब!
छत्रपती संभाजीनगर : अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये हायटेक पद्धतीने कार चोरणारी टोळी वर्षभरानंतर पुन्हा सक्रिय झाली आहे. त्यामुळे दुचाकी चोरीपाठोपाठ महागड्या कार सुरक्षित ठेवण्याचे आव्हान नागरिकांसमोर आहे. गेल्या तीन दिवसांत शहरातून दोन कार चोरीला गेल्या. या घटनांत एकाच प्रकारची कार चोरून एकाच तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकारी रविराज पवार (४१) कुटुंबासह ज्योतीनगरमध्ये राहतात. १० फेब्रुवारी रोजी रात्री १२:३० वाजता त्यांनी घराबाहेर कार उभी केली होती. सकाळी ९:३० वाजता कार आढळून आली नाही. विशेष म्हणजे, विद्यमान आमदारांच्या निवासस्थानासमोरच ही चोरी झाली. दुसऱ्या घटनेत व्यावसायिक संदीप नाथानी (४५, रा. सिंधी कॉलनी) यांनी त्यांची कार घरासमोरील मोकळ्या मैदानात उभी केली होती. ११ फेब्रुवारी रोजी सकाळी कार चोरीला गेल्याचे त्यांना कळले.
अवघ्या १० ते १५ मिनिटांत चोरी
-पोलिसांच्या माहितीनुसार, गेल्या चार वर्षांतील बहुतांश घटनांत एकाच कंपनीच्या कार चोरल्या जात आहेत. रेकी करून ते संधी साधतात.
-ज्योतीनगरमध्ये रात्री १ वाजून २६ मिनिटांनी कारजवळ जात १:३८ वाजेपर्यंत कार लंपास.
-सिंधी कॉलनीत ३ वाजून १४, तर ३:२९ दरम्यान कार अनलॉक करून पसार.
हायटेक किटचा वापर
-कार चोरीत दिल्ली, चिनी बाजारपेठेत उपलब्ध ओबीडी डिव्हाइस, रिलेबॉक्सचा वापर केला जातो.
-किटद्वारे कारचा इंजिन कोड स्कॅन करून लॅपटॉपच्या साहाय्याने विशिष्ट सॉफ्टवेअरच्या मदतीने कारच्या इलेक्ट्रॉनिक सिस्टममध्ये प्रवेश मिळवला जातो.
-स्थानिक टोळ्या एकाच वेळी बोनटमधील वायरमध्ये बदल करूनही दरवाजा उघडतात.
-ओबीडी डिव्हाइस कारला कनेक्ट केले जाते. त्यानंतर कारचे सेन्सर, जीपीएसचे नियंत्रण चोरांच्या हाती जाते.
-त्यानंतर बनावट चावीने कार स्टार्ट करून तत्काळ राज्याबाहेर पसार होतात.
कशी काम करते की-लेस एंट्री?
की-लेस एंट्री असलेल्या कारमध्ये विशेषतः रिले डिव्हाइसचा वापर होतो. या पद्धतीत कारच्या स्मार्ट कीमधून निघणारे रेडिओ सिग्नल रिले बॉक्सद्वारे कॅप्चर करून कारपर्यंत पोहोचवले जाते. त्यामुळे कारला मूळ चावी जवळ असल्याचे सिग्नल मिळते व ती अनलॉक होते.
-यानंतर चोरटे कारच्या डॅशबोर्डखालील ओबीडी (ऑन बोर्ड डायग्नोस्टिक्स) पोर्टमध्ये विशेष डिव्हाइस लावून कारच्या ईसीयू (इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट) मध्ये प्रवेश मिळवून काही मिनिटांत नवीन स्मार्ट की प्रोग्रामिंग सेट करतात. त्यामुळे कारमधील इमॉबिलायझर सिस्टम (इंजिन सुरू होऊ न देणारी सुरक्षा प्रणाली) निष्क्रिय होऊन मूळ चावीशिवाय कार सुरू करता येते.
२०२४ मध्ये रेकॉर्डवर आल्या होत्या टोळ्या
-२०२४ मध्ये ऑगस्ट-सप्टेंबरदरम्यान उस्मानपुरा, जवाहरनगरमधूनच एकाच कंपनीच्या कार लंपास झाल्या. तेव्हा बुलढाणा, जालनास्थित बाप-लेकासह कार चोरणारी टोळी पोलिस रेकॉर्डवर आली.
-जवळपास ३० गुन्हे दाखल असलेल्या बाप-लेकाने २०२३-२४ मध्ये आठ महिन्यांत शहरातून ९, तर अन्य जिल्ह्यांतून ५ कार चोरून पंजाब, हरियाणा, राजस्थानमध्ये विकल्या होत्या.
-ऑक्टोबर २०२५ मध्ये शहरातून तीन कार चोरीला गेल्या होत्या.
अशी घ्या खबरदारी
-कंपनीचे अधिकृत सूचना देणारे सेक्युरिटी ॲप मोबाइलमध्ये अवश्य वापरा.
-स्मार्ट की घराच्या दरवाजाजवळ ठेवू नका.
-स्मार्ट कीसाठी सिग्नल रोखणारे कव्हर (फॅराडे पाउच) वापरा.
-कार नेहमी उजेडात व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीत पार्क करा.
-कारमध्ये अतिरिक्त (स्पेअर) चावी ठेवू नका.
-शक्य असल्यास स्टिअरिंग लॉक किंवा व्हील लॉक वापरा.
-कारचे दरवाजे लॉक आहेत याची दोनदा खात्री करा.
-ओबीडी पोर्टसाठी लॉक कव्हर बसवा.
-कारमध्ये अद्ययावत जीपीएस ट्रॅकर बसवा.