मराठवाड्यातील तीनशे मंडळांत दमदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 13:01 IST2018-06-13T12:59:36+5:302018-06-13T13:01:00+5:30
मराठवाड्यातील ४२१ पैकी ३०० मंडळांमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली आहे

मराठवाड्यातील तीनशे मंडळांत दमदार पाऊस
औरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ पैकी ३०० मंडळांमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली आहे, तर १२१ मंडळांमध्ये आजवर फक्त पावसाची हजेरी लागली आहे. परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांतील बहुतांश सर्व मंडळांमध्ये १०० टक्क्यांच्या आसपास पाऊ स झाला आहे.
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांतील अनेक मंडळांमध्ये पावसाने हजेरी लावलेली नाही. ७ जूनपासून महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होण्याची तारीख असते. १२ जूनपर्यंत मराठवाड्यातील ५० टक्के भागात पावसाने हजेरी लावली आहे.
गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात विभागातील चार जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला होता. परिणामी मराठवाड्यातील ५० टक्के भागाला १ हजारहून अधिक टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. १६ लाखांपर्यंतची लोकसंख्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. जून अखेरपर्यंत समाधानकारक पाऊस न झाल्यास टँकरची संख्या १ हजारांच्या आसपास कायम राहण्याची महसूल विभागाने वर्तविली आहे.
७ जूननंतर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या उन्हाळ्यातही पुरेसा पाऊस झाला नाही. यंदाही पावसाची सुरुवात हलक्या रूपाने झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. औरंगाबादमधील ११ मंडळांत १०० टक्के पावसाची नोंद झाली आहे. जालन्यातील २४, परभणीतील ३९, हिंगोलीतील २८, नांदेडमधील ७४, बीडमधील ३३, लातूरमधील ५२, उस्मानाबादमधील ३९ मंडळांत पावसाने हजेरी लावली आहे.
जिल्हा एकूण मंडळ १००% पावसाची मंडळे
औरंगाबाद ६५ ११
जालना ४९ २४
परभणी ३९ ३९
हिंगोली ३० २८
नांदेड ८० ७४
बीड ६३ ३३
लातूर ५३ ५२
उस्मानाबाद ४२ ३९
एकूण ४२१ ३००