औरंगाबादमध्ये पावसाची दमदार हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 23:55 IST2018-06-02T23:54:23+5:302018-06-02T23:55:00+5:30
दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि.२) दुपारी ४ वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. जवळपास ४५ मिनिटे दमदार बरसलेल्या सरींनी काही भागातील इमारतींमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची धावपळ झाली.

औरंगाबादमध्ये पावसाची दमदार हजेरी
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि.२) दुपारी ४ वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. जवळपास ४५ मिनिटे दमदार बरसलेल्या सरींनी काही भागातील इमारतींमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची धावपळ झाली. जोरदार वाºयासह विजांच्या कडकडाटात झालेल्या पावसात अनेक भागांतील वीज गुल झाली. चिकलठाणा वेधशाळेत तासाभरात ३२ मि. मी. पावसाची नोंद झाली.
उन्हाळ्यातील तापमानाच्या वाढत्या पाºयामुळे शहरवासीय तीन महिने घामाघूम झाले; मात्र जून महिन्याच्या सुरुवातीलाच नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. ऊन-सावल्यांच्या खेळानंतर १ जूनला रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर शहरासह परिसरात पावसाने हजेरी लावली. सलग दुसºया दिवशी शनिवारी पावसाने हजेरी लावली. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात येत होता. अखेर दुपारी ४ वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. पावसाने सुरुवातीला चांगलाच जोर धरला. जवळपास ४५ मिनिटे पाऊस चांगलाच बरसला, मात्र त्यानंतर काही वेळ नुसतीच भुरभुर होती.
शहरातील जयभवानीनगर परिसरात गारा पडल्या. पावसात भिजण्यासह गारा गोळा करण्याचा आनंद लहान मुलांनी लुटला. शहर आणि परिसरात दुपारी पावसाला सुरुवात होताच विविध भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. पावसामुळे जयभवानीनगर आणि सूतगिरणी चौकातील इमारतीत पाणी शिरण्याचा प्रकार झाला. तसेच दिल्ली गेट, एन-३, शहानूरवाडी, एन-४ परिसरात झाडे उन्मळून पडली. त्यामुळे याठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांनी मदतीसाठी धाव घेतली. तासभर झालेल्या पावसाने शहरातील रस्ते जलमय झाले, तर वातावरणात गारठा निर्माण झाला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने त्रस्त झालेल्या शहरवासीयांना दिलासा मिळाला. तासाभरात ३२ मि.मी.पावसाची नोंद चिकलठाणा वेधशाळेत झाली.
साथरोगांचा धोका
पावसाळ्यात शहरात आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कचराकोंडीमुळे रस्तोरस्ती पडलेला कचरा शनिवारी भिजून गेला. पावसाच्या पाण्याबरोबर ठिकठिकाणी कचरा रस्त्यावरही आला. परिणामी साथरोग पसरण्याचा धोका व्यक्त होत आहे.