ऊन वाढले; टायरकडे दुर्लक्ष पडू शकते महाग ! नायट्रोजन की साधी हवा, कोणती उपयुक्त?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 11:48 IST2025-02-24T11:48:36+5:302025-02-24T11:48:36+5:30
तुम्ही टायरची वेळोवेळी देखभाल करीत असाल तरी ते कालांतराने हळूहळू खराब होतात.

ऊन वाढले; टायरकडे दुर्लक्ष पडू शकते महाग ! नायट्रोजन की साधी हवा, कोणती उपयुक्त?
छत्रपती संभाजीनगर : तुमच्याकडे दुचाकी असो, चारचाकी असो वा व्यावसायिक वाहन; तुम्ही स्वत:ची गाडी स्वच्छ दिसावी यासाठी वॉशिंग करीत असतात. मात्र, वाहनाचे चाकही तेवढेच महत्त्वाचे असते. टायरमध्ये हवा जास्त किंवा कमी असेल, टायरच्या देखभालीकडे दुर्लक्ष करीत असाल तर एखाद्या वेळेस हा निष्काळजीपणा जिवावर बेतू शकतो.
तापमान वाढतेय
शहराचे तापमान हळूहळू वाढू लागले आहे. मागील १० वर्षांचा विचार केल्यास आतापर्यंत शहराचे तापमान सर्वाधिक ४३.६ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात आले आहे.
उन्हाळ्यात टायर का फुटतात ?
उन्हाळ्यात रस्ते गरम झालेले असतात. आता सर्वत्र सिमेंटचे रस्ते आहेत. सिमेंट जास्त तापत असते. अशा वेळी जर टायरमधील हवा जास्त किंवा कमी झाली तर टायर फुटण्याची शक्यता जास्त असते. टायरमधील हवा हळूहळू दाबामुळे कमी कमी होऊ लागते. यामुळे ‘माइलेज’ही कमी होऊ लागते. हवा कमी असली तर चाक घासून त्याची झीज होते, तसेच पिकअप घेताना जास्त ताकद लावते, यामुळे इंधन जास्त लागते.
किती किलोमीटरला टायर बदलावे ?
तुम्ही टायरची वेळोवेळी देखभाल करीत असाल तरी ते कालांतराने हळूहळू खराब होतात. खराब टायर वाहनाच्या कार्यक्षमतेवर परिणाम करीत असते. कारचे टायर सरासरी पाच वर्षे किंवा ५० हजार किमी चालते. नव्या टायरवरील ट्रेड डेप्थ आठ ते नऊ मिलिमीटर इतकी असते. रबराची जाडी नंतर कमीकमी होत जाते. ट्रेड डेप्थ १,६ मिलिमीटर किंवा त्यापेक्षा कमी झाली तर तो टायर बदलण्याची वेळ आली आहे, हे लक्षात घ्यावे.
टायरमध्ये नायट्रोजन अधिक सुरक्षित
वाहन कोणतेही असो उन्हाळ्यात गरम होतातच. यामुळे टायरचे आयुष्यही कमी होते. यासाठी ट्यूबमध्ये नायट्रोजन भरल्यास टायर थंड राहते व टायरचे आयुष्यदेखील वाढते.
- मुन्नाभाई गॅरेजवाले