औरंगाबाद : केंद्रीय आरोग्य मंत्रालयांतर्गत देशभरात राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या माध्यमातून देशातील आरोग्यसेवा सुधारण्यात येत आहे. या योजनेला आणखी बळकटी देण्याच्या अनुषंगाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या एका पथकाने सोमवारी औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय आणि एका प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी केली. आरोग्य उपसंचालक डॉ. रविकिरण चव्हाण यांनी सांगितले की, केंद्रीय आरोग्य मंत्रालय सुधारित राष्ट्रीय आरोग्य मिशन ही योजना सुरू करणार आहे. विद्यमान ग्रामीण आरोग्यसेवेचे मूल्यमापन करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील उपसचिव जगन्नाथ आणि राष्ट्रीय आरोग्य मिशनचे संचालक प्रीती पंत, उपायुक्त डॉ. एम.के. अग्र्रवाल, आकाशमलिक यांच्या पथकाने सोमवारी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयास आणि पिंपळवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी या रुग्णालयातील उपलब्ध सुविधा, तेथे कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग कर्मचारी आणि आशा आदी पदांवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती घेतली, तसेच रुग्णालयातील मेडिकल स्टोअरची अवस्था, रुग्णांना मोफत औषधी मिळतेअथवा नाही याबाबत शहानिशा केली. या पथकासोबत उपसंचालक डॉ. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.टी. जमादार, सिव्हिल सर्जनच्या प्रतिनिधी डॉ. सुनीता गोलाईत आदींची उपस्थिती होती.हे पथक सोमवारी सायंकाळी दिल्लीला परत गेले. त्यानंतर ते आपला अहवाल शासनास सादर करणार आहे.
केंद्रीय पथकाकडून आरोग्यसेवेची पाहणी
By admin | Updated: October 15, 2014 00:47 IST