"युद्ध थांबावं, आम्हाला सुखरूप घरी जाता यावं"; छ. संभाजीनगरमध्ये ६५ परदेशी पाहुण्यांची प्राथना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 12:28 IST2026-03-02T12:26:03+5:302026-03-02T12:28:02+5:30
अजिंठा-वेरूळच्या शांततेत परदेशी पाहुण्यांना युद्धाची चिंता; १३ देशांच्या प्रतिनिधींची सुरक्षित परतीसाठी बुद्ध चरणी प्रार्थना

"युद्ध थांबावं, आम्हाला सुखरूप घरी जाता यावं"; छ. संभाजीनगरमध्ये ६५ परदेशी पाहुण्यांची प्राथना
छत्रपती संभाजीनगर : इतिहास, कला आणि संस्कृतीच्या शांत वातावरणात फिरत असतानाही परदेशी पाहुण्यांच्या मनात मात्र युद्धाची चिंता पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरच्यापर्यटनस्थळांचा आनंद घेताना त्यांच्या नजरा वारंवार मोबाईलवर अमेरिका–इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाच्या बातम्यांकडे वळत आहेत. अजिंठा-वेरूळच्या शांत लेणीत इतिहासाचे सौंदर्य अनुभवताना परदेशी प्रतिनिधींच्या मनात एकच इच्छा उमटत आहे, ती म्हणजे जगात शांतता नांदावी अन् घरी परतण्याचा प्रवास सुरक्षित व्हावा.
वेरुळ-अजिंठा ही जागतिक वारस्थास्थळे असलेल्या पर्यटननगरीत ‘फॅमल रायझिंग टूर’साठी आलेल्या काही प्रतिनिधींनीही पर्यटनाचा आनंद घेत असतानाच युद्ध लवकर थांबावे आणि आपला परतीचा प्रवास सुरक्षित व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. ब्राझील, चीन, जर्मनी, इंडोनेशिया, जपान, मलेशिया, रशिया, दक्षिण कोरिया, श्रीलंका, नेदरलँड्स, युनायटेड किंगडम, अमेरिका आणि व्हिएतनाम या १३ देशांतील प्रतिनिधींनी अजिंठा, वेरूळ, देवगिरी किल्ला, बीबी का मकबरा या स्थळांना भेटी दिल्या. दिवसभर ऐतिहासिक ठिकाणे पाहताना ते उत्साहाने फोटो, व्हिडिओ आणि अनुभव शेअर करीत असले तरी मोबाईलवर युद्धाच्या घडामोडींच्या बातम्यांवर त्यांची नजर सतत असल्याचे दिसून आले. युद्धाच्या बातम्यांमुळे परतीच्या प्रवासाची काहीशी चिंता व्यक्त केली. हे प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरहून नाशिकला रवाना होतील. प्रतिनिधींचा आणखी एक गट २ व ३ मार्चला शहरात येणार आहे.
पर्यटन आनंदासाठी, भीतीसाठी नाही
काही प्रतिनिधींनी अनौपचारिक संवादात सांगितले की, भारताचा प्रवास अतिशय सुंदर आणि शांततेचा अनुभव देणारा आहे. आम्ही येथे पर्यटनाचा आनंद घेत आहोत; मात्र जगात संघर्ष सुरू असताना मन पूर्णपणे मोकळे होत नाही. युद्ध थांबावे आणि सर्व देशांमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, हीच अपेक्षा आहे. अनेक प्रतिनिधींनी इतिहासातील युद्धांच्या कथा पाहिल्यानंतर आजच्या जगाने शांततेचे महत्त्व अधिक समजून घ्यायला हवे, असे मत व्यक्त केले. अजिंठा लेणीतील बौद्ध संस्कृतीचा शांततेचा संदेश आणि वर्तमानातील संघर्ष यातील विरोधाभास त्यांनी अधोरेखित केला.
थोडी चिंता
येथील पर्यटनस्थळांना भेट दिली. अतिशय प्रेरणादायी आणि सुंदर अनुभव आले. युद्धाच्या स्थितीमुळे थोडी चिंता आहेच. घरी जाण्याचा प्रवास सुखकर होईल, अशी आशा आहे.
- पॅट्रिशिया हावेमन, नेदरलँड्स