अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी गॅस टंचाईमुळे ‘चूल’ पेटवली; पण आता दोन दिवसांचे लाकूड उपलब्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 14:04 IST2026-03-14T14:02:34+5:302026-03-14T14:04:06+5:30
विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालविलेल्या ‘खानावळी’वर लाकूड संकट; छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय महाविद्यालयातील चित्र

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी गॅस टंचाईमुळे ‘चूल’ पेटवली; पण आता दोन दिवसांचे लाकूड उपलब्ध
छत्रपती संभाजीनगर : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थीच विद्यार्थ्यांसाठी खानावळ चालवितात. या खानावळीचे नियोजनही विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या समित्यांच्या माध्यमातून केले जाते. मात्र, चार दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडर संपल्यामुळे विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या परिसरात पडलेली लाकडे जमा करून चूल पेटवली. त्यावर चार दिवसांपासून स्वयंपाक सुरू आहे. मात्र, हे लाकूडही येत्या दोन दिवसांत संपेल. त्यामुळे गॅस मिळाला नाही तर विद्यार्थ्यांना लाकडाच्या शोधात महाविद्यालयाबाहेर पडावे लागणार आहे.
चार वर्षांपासून हा उपक्रम अतिशय उत्तमपणे चालविला जातो. त्यासाठी ‘फायनान्स’, ‘फूड’, ‘किराणा खरेदी’, ‘स्वच्छता’ अशा विविध समित्या आहेत. त्या समित्यांवर सोपविलेली जाबबादारी संबंधित चोखपणे बजावतात. मात्र, युद्धामुळे सिलिंडरची टंचाई आहे. विद्यार्थी ‘खानावळी’मध्ये व्यावसायिक सिलिंडर मिळेनासे झाल्यानंंतर समितीच्या सदस्य असलेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या परिसरात पडलेली लाकडे जमा केली. त्यावरच परिसरात चुली मांडून पोळी, भाज्या, भात वगैरे बनविण्यात येत आहेत. मात्र, लाकडेही दोन दिवस पुरतील एवढीच आहेत. त्यामुळे आतापासूनच लाकडांचा शोध घेण्यास सुरुवात केल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली.
२०० विद्यार्थ्यांचा बनतो स्वयंपाक
येथे २०० विद्यार्थ्यांचा रोज स्वयंपाक बनविण्यात येतो. त्यासाठी जून महिन्यातच विद्यार्थ्यांकडून भांडवली गुंतवणूक म्हणून प्रत्येकी ४ हजार रुपये जमा करून घेतले जातात. त्यानंतर प्रत्येक महिन्याला झालेला खर्च सर्वच विद्यार्थ्यांकडून समप्रमाणात जमा केला जातो. यासाठी नियुक्त समिती हिशेब ठेवते. वर्षाच्या शेवटी सुरुवातीला जमा केलेले ४ हजार रुपयांचे डिपॉझिट सर्वांना परत केले जाते. या खानावळीत चार महिला, एक स्वयंपाकी आणि इतर कर्मचारी काम करतात.
आणखी लाकूड जमा करावे लागणार
लाकूड आणखी दोन दिवस पुरेल एवढेच आहे. त्यामुळे आणखी लाकूड उपलब्ध करावे लागणार आहे. तोपर्यंत गॅस सिलिंडर उपलब्ध झाला तर लाकूड आणण्याची गरज पडणार नाही.
- भावेश कानडे, विद्यार्थी सरचिटणीस, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय