सासऱ्याला हृदयविकाराचा झटका; जावयाने ५ तास कार रुग्णालयाबाहेरच थांबविल्याने मृत्यू!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 17:42 IST2025-06-11T17:41:34+5:302025-06-11T17:42:35+5:30
रुग्णालयात नेलेच नसल्याचे महिन्याभरानंतर उघडकीस : सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, जावयाला अटक

सासऱ्याला हृदयविकाराचा झटका; जावयाने ५ तास कार रुग्णालयाबाहेरच थांबविल्याने मृत्यू!
छत्रपती संभाजीनगर : कौटुंबिक वादात जावयाने सासऱ्याला जोरात ढकलून दिले. यात हृदयावर ताण आल्याने सासऱ्याची प्रकृती खालावली. बेशुद्ध पडल्याने जावयानेच त्यांना एमजीएम रुग्णालयात घेऊन जाण्याचे नाटक केले. मात्र, रुग्णालयात न नेता बाहेरच ५ ते ६ तास तसेच कारमध्ये ठेवून मृत्यू झाल्यानंतर मृतदेहच घरी नेला. वडिलांच्या मृत्यूच्या कारणाचा तपास करताना मुलीला नवऱ्याचा हा विकृतपणा कळाल्यानंतर पोलिसांकडे तक्रार केली. त्यावरून अखिलेश यादगिरी मुदिराज (३८, रा. नंदनवन कॉलनी) याला अटक केली.
सुनीलकुमार चोप्रा (६८, रा. गुलमोहर कॉलनी, एन-५) असे मृत ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. त्यांच्या दोन्ही मुली विवाहित असून, मोठी मुलगी स्वाती हिचा अखिलेशसोबत विवाह झाला. मात्र, त्यांच्यात सतत कौटुंबिक कलह होत. १ मे राेजी अखिलेश रात्री ९:३० वाजता सासरी गेला. तेथे त्याने स्वातीसोबत भांडण सुरू केले. सुनीलकुमार व त्यांची पत्नी डॉली यांनी त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखिलेशने त्यांना जोरात धक्का देत दूर ढकलले. सुनील कोसळल्याने डाॅली यांनी त्यांना आतील खोलीत नेले. तरीही अखिलेश आरडाओरडा करीतच होता. यात हृदयावर दबाव येऊन सुनीलकुमार बेशुद्ध पडले. रात्री ११ वाजता अखिलेश चालकासोबत त्यांना रुग्णालयात घेऊन गेला.
पत्नीला म्हणाला, वडिलांवर आत उपचार सुरू
अखिलेशवर विश्वास नसल्याने आईच्या सांगण्यावरून स्वाती एमजीएम रुग्णालयात पोहोचल्या. तेथे अखिलेशने कॅज्युअल्टी विभागात तपासणी सुरू आहे. मी येथे थांबतो. तू मुलांना घेऊन घरी जा, असे सांगितले. मात्र, पहाटे ४ वाजता अखिलेश थेट मृतदेहच घरी घेऊन गेला. अखिलेशने त्यांच्या शवविच्छेदनावरूनदेखील मोठा वाद घातला. त्यामुळे २ मे रोजी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.
कारमध्ये मृत्यू होऊ दिला, जावयावर आरोप
वडिलांच्या मृत्यूबाबत सतत मनात शंका येत असल्याने डॉक्टर असलेल्या स्वाती यांनी तपास करण्याचे ठरवले. त्यांनी ४ जून रोजी एमजीएम रुग्णालयाकडे वडिलांच्या उपचाराबाबत अर्जाद्वारे कागदपत्रे मागवली. मात्र, रुग्णालय प्रशासनाने सुनीलकुमार नावाच्या कुठल्याच रुग्णाला १ मे रोजी दाखल केले नाही तसेच कुठलेही उपचार केले गेले नाहीत, असा अहवाल दिला. तेव्हा अखिलेशचा बनाव समजला. या प्रकाराला अखिलेशच जबाबदार असल्याचा आरोप डॉली यांनी तक्रारीत केला. त्यावरून अखिलेशवर बीएनएस १०५ अंतर्गत (सदोष मनुष्यवध) गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले. अखिलेश हा व्यावसायिक सल्लागार आहे. त्याला न्यायालयाने ३ दिवस पोलिस कोठडी सुनावल्याचे पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी सांगितले.