रात्रीची गस्त तरीही वाळूचोरी बिनधास्त

By Admin | Updated: May 13, 2014 01:01 IST2014-05-13T00:14:27+5:302014-05-13T01:01:46+5:30

पाथरी :रात्रीच्या वाळूचोरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रात्रीची गस्त सुरु केली असली तरी वाळूचोरटे मात्र बिनबोभाटपणे वाळूची वाहतूक करीत आहेत.

Even the patrol of the night is stuck in the sand | रात्रीची गस्त तरीही वाळूचोरी बिनधास्त

रात्रीची गस्त तरीही वाळूचोरी बिनधास्त

पाथरी :रात्रीच्या वाळूचोरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रात्रीची गस्त सुरु केली असली तरी वाळूचोरटे मात्र बिनबोभाटपणे वाळूची वाहतूक करीत आहेत. गोदावरी नदीच्या पात्रातून सायंकाळच्या नंतर वाळू उपसा नियमाप्रमाणे करता येत नाही. परंतु, वाळूचा लिलाव झालेल्या ठेक्यावरुन राजरोसपणे रात्री वाळू उपसा करुन वाळूची वाहतूकही मोठ्या प्रमाणावर सुरु होती. महसूल प्रशासनाने यावर निर्बंध लादण्याऐवजी याकडे दुर्लक्ष केल्याने जिल्हाधिकारी एस.पी.सिंह यांनी प्रत्येक तालुकास्तरावर पोलिस संरक्षणामध्ये प्रत्येकी दोन पथके स्थापन करुन रात्रीच्या वाळू वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला. पाथरी तालुक्यात पाथरी, मानवत आणि सोनपेठ या तीन तालुक्यांमध्ये सायंकाळी ६ ते सकाळी ६ या कालावधीसाठी रात्रीचे पथके तयार करण्यात आली खरी. परंतु, रात्रीच्या वाळू चोरीवर अद्यापही या पथकाला नियंत्रण ठेवता आले नाही. सर्रासपणे या तिन्ही तालुक्यांतून रात्रीची वाळू वाहतूक केली जात असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे वाळू पट्ट्याच्या ठेकेदारांनाचेच या वाळू वाहतूकदारांना संरक्षण असल्याने पथकही रात्रीची वाळू रोखण्यामध्ये असमर्थ ठरले आहेत. जिल्हा प्रशासन याबाबीकडे गांभीर्याने घेत असले तरी पथकातील अधिकारी आणि कर्मचारी मात्र वाळूमाफियांच्या दंडशाहीपुढे हतबल झाल्याचे दिसून येत आहे. पाथरी शहरात मागील १५ दिवसांपूर्वी अशाच एका पथकातील नायब तहसीलदाराला मारहाण झाल्याची घटना ताजी आहे. यामुळे रात्रीच्या वेळी वाळूची वाहतूक करुन लाखो रुपयांची कमाई करणार्‍या वाळू माफियांनी प्रशासनासमोर एक नवे आव्हान उभे केल्याचे दिसून येत आहे. शेकडो वाहनांतून होते वाहतूक पावसाळा सुरु झाला की गोदावरी पात्रातील वाळू उपसा बंद होतो. गोदाकाठचे कच्चे रस्ते चिखलाने माखल्या गेल्याने वाहतूक करता येत नाही. यामुळे मे महिन्यामध्ये होईल तेवढा वाळूचा उपसा पात्रातून करण्याचा सपाटा या ठेकेदारांकडून लावला जातो. बर्‍याचवेळी पात्रा लगतही मोठ्या प्रमाणावर वाळूचा साठा केला जात आहे. (वार्ताहर) रस्ते बनले आडकाठी गोदावरी पात्रातील वाळू उपशाने गोदाकाठचे रस्ते पूर्णत: खराब झाले आहेत. रात्रीची वाळू रोखण्यासाठी शहरात पथके तयार केली खरी. परंतु, जिल्ह्याच्या सीमेवरुन वाळूची वाहतूक वेगळ्या मार्गावरुन गोदापात्रातून केली जाते. यावेळी गोदापात्रातील रात्रीची वाहतूक रोखण्यासाठी खराब रस्ते प्रशासनाला आडकाठी ठरत आहेत. तसेच अधिकारी येणार असल्याची खबर अगोदरच मिळत असल्याने पात्रातून क्षणात वाहने गायब होतात. यामुळे कोणत्याही मार्गाने रात्रीची वाळू रोखण्यासाठी केलेले प्रयत्न निष्फळ ठरत आहेत.

Web Title: Even the patrol of the night is stuck in the sand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.