डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सान्निध्य लाभलेले त्र्यंबकराव डेंगळे यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 18:07 IST2025-06-17T18:06:43+5:302025-06-17T18:07:32+5:30
समाजकल्याण विभागाचे माजी सहसंचालक त्र्यंबकराव डेंगळे काळाच्या पडद्याआड

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सान्निध्य लाभलेले त्र्यंबकराव डेंगळे यांचे निधन
छत्रपती संभाजीनगर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेल्या आणि सामाजिक चळवळीच्या विविध टप्प्यांवर कार्यरत असलेल्या सेवानिवृत्त समाजकल्याण सहसंचालक त्र्यंबकराव दिगंबरराव डेंगळे (वय ९२, रा. जयसिंगपूरा) यांचे सोमवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने एक अनुभवी, निष्ठावान व समर्पित आंबेडकरी कार्यकर्ते हरपले गेले आहेत. त्यांच्यावर बेगमपुरा स्मशानभूमीत शोकमग्न वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
बाबासाहेबांच्या शिक्षणक्रांतीचे साक्षीदार
डेंगळे हे मिलिंद महाविद्यालयाच्या दुसऱ्या बॅचचे विद्यार्थी होते. त्या काळी महाविद्यालयाचे वर्ग छावणीतील निजाम बंगल्यात भरत असत. नंतर जेव्हा नागसेनवन परिसरात मिलिंद महाविद्यालयाची इमारत उभारली गेली, तेव्हा बाबासाहेबांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली राऊंड होस्टेलची स्थापना केली. त्याच दरम्यान डेंगळे यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले होते.
बाबासाहेबांचा विश्वास
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्र्यंबकराव डेंगळे यांच्यावर विश्वास ठेवत राऊंड होस्टेलच्या रेक्टरपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. ही केवळ प्रशासनिक जबाबदारी नव्हे, तर आंबेडकरी विद्यार्थी घडवण्याची सामाजिक जबाबदारी होती. त्यांच्या या कार्यकाळात असंख्य विद्यार्थ्यांना आधार मिळाला.
धर्मांतर सोहळ्यातील सहभाग
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे डॉ. आंबेडकर यांच्या उपस्थितीत भव्य धम्मदीक्षा सोहळा पार पडला होता. या ऐतिहासिक प्रसंगी मंचावर सादर करण्यात आलेल्या प्राचार्य म. भि. चिटणीस लिखित ‘युगयात्रा’ या नाटकात डेंगळे यांनी भूमिका साकारली होती. ही गोष्ट त्यांचं बाबासाहेबांच्या सांस्कृतिक व वैचारिक कार्यातले योगदान दर्शवते.
समाजकल्याण विभागातील कार्य
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर डेंगळे यांनी आपले संपूर्ण आयुष्य सामाजिक कार्यास समर्पित केले. त्यांनी समाजकल्याण विभागात नोकरी स्वीकारली आणि सहसंचालक म्हणून सेवानिवृत्त होईपर्यंत निष्ठेने सेवा केली. समाजातील वंचित, उपेक्षित घटकांसाठी त्यांनी अनेक उपक्रमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या निधनामुळे आंबेडकरी विचारसरणीचा एक सजीव दुवा हरपला आहे. त्यांचे कार्य आणि बाबासाहेबांशी असलेले नातं हे पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील.