'आमच्या बायकोचे ऐकू नकोस'; पिंपळ पौर्णिमेनिमित्त पत्नी पीडित पुरुषांची यमराजाला विनवणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 14:43 IST2025-06-10T14:24:10+5:302025-06-10T14:43:41+5:30
करोडी येथील पत्नी पीडित पुरुष आश्रमात पार पडलेल्या या कार्यक्रमात न्यायव्यवस्था, कायदे आणि सामाजिक मानसिकतेतील एकतर्फी दृष्टिकोन बदलण्याचा निर्धार करण्यात आला.

'आमच्या बायकोचे ऐकू नकोस'; पिंपळ पौर्णिमेनिमित्त पत्नी पीडित पुरुषांची यमराजाला विनवणी
वाळूज महानगर : स्त्रीसाठी वटसावित्री, तर पुरुषांसाठी पिंपळ पौर्णिमा ही न्यायाच्या साकड्यासाठी असावी, हा सामाजिक संदेश देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पत्नी पीडित पुरुष आश्रम, करोडी येथे सोमवारी कावळ्याच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. पुरुषांनी पिंपळ पौर्णिमा साजरी केली. सकाळी १० वाजता पिंपळाच्या साक्षीने सुरू झालेल्या या कार्यक्रमात, अन्याय पीडित पुरुषांनी आपल्या व्यथा मांडल्या.
करोडी येथील पत्नी पीडित पुरुष आश्रमात पार पडलेल्या या कार्यक्रमात न्यायव्यवस्था, कायदे आणि सामाजिक मानसिकतेतील एकतर्फी दृष्टिकोन बदलण्याचा निर्धार करण्यात आला. पिंपळ वृक्षाची पूजा करत, पुरुषांवर होणाऱ्या अन्यायांविरोधात आवाज उठवला. पुरुषांसाठी ‘पिंपळ पौर्णिमा’ ही न्यायाच्या साकड्यासाठी असावी, असा भाव कार्यक्रमातून व्यक्त झाला. यावेळी उपाध्यक्ष सुरेश फुलारे, सचिव चरणसिंग गुसिंगे, सोमनाथ मनाळ, एकनाथ राठोड, भाऊसाहेब साळुंके, प्रवीण कांबळे, श्रीराम तांगडे, संजय भांड, वैभव घोळवे, दिनेश दुधाट, उमेश दुधाट आदींची उपस्थिती होती. यावेळी पत्नी पीडित पुरुष आश्रमाने शासनासमोर ५ ठोस आणि लिंगनिरपेक्ष मागण्या मांडल्या.
शासनाकडून काय अपेक्षा?
- राष्ट्रीय पुरुष आयोगाची तातडीने स्थापना करावी
- खोट्या तक्रारींवर कठोर व लिंगनिरपेक्ष कारवाई आणि शिक्षेची तरतूद असावी
- प्रत्येक जिल्ह्यात पुरुष तक्रार निवारण केंद्र सुरू करावे
- पोलिस ठाण्यांमध्ये पुरुष दक्षता कक्ष तयार करणे
- कौटुंबिक वाद वर्षभरात निकाली काढण्यासाठी स्वतंत्र न्याय प्रक्रिया निर्माण करणे
एकाच जन्मात उद्ध्वस्त होतो पुरुष
पुरुष हा केवळ एक वेतन आणणारा घटक नाही. तो एक मुलगा आहे, एक पती, एक वडील आहे. पण, दुर्दैवाने त्याच्या वेदनांकडे कुटुंब, समाज, कायदा आणि यंत्रणा डोळेझाक करतात.
११,००० पुरुष आश्रमाशी संलग्न
अनेकदा खोट्या तक्रारी, मानसिक छळ, जबरदस्तीची पोटगी आणि सामाजिक टाळेबंदी यामुळे पुरुष पूर्णतः कोसळतो. सिस्टीम पुरुषांविरुद्ध आहे अशी वेदना अनेकांच्या बोलण्यातून उमटली. या आश्रमाशी आजपर्यंत ११,००० हून अधिक पीडित पुरुष जोडले गेले आहेत. एकतर्फी कायद्यांमुळे पुरुषाला स्पष्टीकरण देण्याची संधी मिळण्याआधीच ‘गुन्हेगार’ ठरविले जात आहे.
देव तरी ऐकेल का?
कार्यक्रमाची सांगता देव तरी आमचे ऐकेल का? या भावना व्यक्त करत करण्यात आली. पिंपळ वृक्षासमोर लीन होऊन ‘सत्य आणि न्याया’च्या साकड्याने या कार्यक्रमाचा समारोप झाला. पुरुषांनाही संवेदना असतात हा संदेश यातून दिला गेला.
वटसावित्रीच्या आदल्या दिवशी पिंपळास साकडे
उद्या वटसावित्री पौर्णिमा आहे. आमच्या बायका उद्या वटवृक्षाला ७ जन्मासाठी साकडे घालतील. मात्र, याच जन्मी आम्ही दररोज मृत्यू अनुभवत आहोत. अशा भांडकुदळ बायकांसोबत एक दिवसही जगणे असह्य आहे. म्हणून पिंपळाला साकडे घालतोय की, खोटारड्या बायकोसोबत संसार करण्यापेक्षा कायम मुंजा ठेव. पिंपळ पौर्णिमेचा हा उद्देश आहे.
- ॲड. भारत फुलारे, अध्यक्ष, पत्नी पीडित पुरुष आश्रम