'स्वतःला फसवू नका'; शिक्षिकेचे ‘ते’ एक वाक्य ठरले आयुष्यभराची शिदोरी : उदय चौधरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 19:38 IST2019-09-05T19:36:34+5:302019-09-05T19:38:40+5:30
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांनी केलेल्या संस्कारांच्या ज्ञानशिदोरीतून घडलो

'स्वतःला फसवू नका'; शिक्षिकेचे ‘ते’ एक वाक्य ठरले आयुष्यभराची शिदोरी : उदय चौधरी
औरंगाबाद : शिक्षकांनी संस्काराच्या रूपाने केलेले मार्गदर्शन आयुष्यभर ज्ञानशिदोरी म्हणून एक महत्त्वपूर्ण ठेवा असतो. माझ्या आजवरच्या प्रवासात शिक्षकांचे योगदान बहुमूल्य असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले. मी स्वत:ला भाग्यवान समजतो. मला प्रत्येक टप्प्यावर योग्य शिक्षक मिळाले. प्राथमिक शाळेपासून, माध्यमिक शाळेपर्यंत सर्व शिक्षक चांगलेच मिळाले. शिक्षक दिनानिमित्त सांगावेसे वाटते की, संस्कृतच्या शिक्षिका मीरा फडणीस यांची आठवण माझ्याकडे एक ठेवा आहे. त्यांनी जे सांगितले, ते आजही मनात आहे, जेव्हा तुम्ही कोणत्याही पदावर काम कराल, त्यावेळी तुम्ही घरच्यांना फसवू शकाल, इतरांना फसवाल; परंतु स्वत:च्या मनाला फसवू शकणार नाही. त्यामुळे कुठलीही कृती करताना कितीही गुपचूप काही केले तर अंतर्मनातील ईश्वर तुम्हाला बघत असतो. तेच वाक्य आजवर माझ्या मनात कायम आहे.
कुठलेही गैरकृत्य माझ्या हातून होण्यापूर्वी ते मार्गदर्शन आधी माझ्या समोर येते. १८ ते १९ वर्षांपासून मी याच वाक्यावर माझी वाटचाल केली आहे. हेच माझ्या लक्षात आहे. आपले मन कधीही आपल्याला माफ करू शकणार नाही. अशी चूक माझ्याकडून तरी आजवर झालेली नाही. जिल्हाधिकारी चौधरी यांचे प्राथमिक शिक्षण सु.ग. देवकर प्रा.विद्यालय, जळगाव, आणि माध्यमिक लालजी नारायण विद्यालय, जळगाव येथे झाले. त्यानंतर पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातून मेकॅनिकल शाखेतून पदवीचे शिक्षण घेतले. पुण्यातच त्यांनी आयएएससाठी प्रशिक्षण घेतले.
आयपीएस अधिकाऱ्याचे मित्ररूपी मार्गदर्शन
शिक्षक मित्र आयएएसच्या अभ्यासातून झाले. यूपीएससी परीक्षेच्या तयारीत शिक्षक, प्राध्यापक असे कुणी नसते. एक मात्र त्या ठिकाणी झाले. रवी पाटील म्हणून आयपीएस अधिकारी आहेत. २००४ च्या बॅचचे ते आयपीएस अधिकारी होते. त्यांनी आता स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. ते सध्या सायबर सुरक्षा तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. मित्रत्वाच्या दृष्टीने त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी मार्गदर्शन केल्यामुळे आयएएस होणे शक्य झाले.
माझी आई विसरलेली नाही
कुलकर्णी नावाच्या शिक्षिकेने सांगितले होते, तुला माहिती नाही, तुझा मुलगा काय आहे. आम्हाला माहिती आहे, तू बघ तुझा मुलगा जिल्ह्यात पहिला येणार. कौटुंबिक परिस्थिती सामान्य होती. त्यामुळे आईला त्यांचे खूप नवल वाटले नाही. माझे परीक्षेत पहिले येणे आईला सामान्यच वाटले. मात्र, पुढे वर्तमानपत्रात प्रसिद्धी मिळाल्यानंतर शिक्षकांच्या योगदानाचे महत्त्व समजले. कुलकर्णी यांचा शब्द अजूनही आई विसरलेली नाही.
शाळकरी जीवनातील क्षण
मी प्राथमिक शाळेत असताना आमच्या शिक्षिका उज्ज्वला कुलकर्णी होत्या. इयत्ता चौथीमध्ये त्यावेळी स्कॉलरशिपच्या परीक्षा होत्या. परीक्षा झालेली होती. स्कॉलशिप परीक्षेच्या निकालापूर्वी शिक्षिका कुलकर्णी आईला म्हणायच्या उदय काय आहे, हे तुला महिती नाही. आम्हाला माहिती आहे. त्यावेळी माझ्या आईला असे वाटायचे हा वर्गात व शाळेत हुशार आहे, काही तरी काम धंदा करील.
( शब्दांकन : विकास राऊत )