खरंच, महावितरणने मान्सूनपूर्व कामे केली ? शहरात गल्लोगल्ली नागरिकांचा जीव टांगणीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 18:49 IST2025-06-19T18:48:58+5:302025-06-19T18:49:20+5:30
चिकलठाण्यातील घटनेच्या पुनरावृत्तीचाच धोका; महावितरणच्या नावात ‘वितरण’ असले, तरी गेल्या काही वर्षांत या विजेच्या वितरणापेक्षा ‘मरण’ अधिकच वाट्याला येत असल्याचीही चिंताजनक परिस्थिती आहे.

खरंच, महावितरणने मान्सूनपूर्व कामे केली ? शहरात गल्लोगल्ली नागरिकांचा जीव टांगणीला
छत्रपती संभाजीनगर : शहरातील गल्लोगल्ली, रस्तोरस्ती झाडांच्या फांद्यांमधून गेलेल्या विद्युत तारा, अगदी हाताच्या अंतरावर लटकणाऱ्या विद्युत वाहिन्यांमुळे नागरिकांचा जीवच टांगणीला लागल्याची स्थिती आहे. ही परिस्थिती पाहता महावितरणने मान्सूनपूर्व कामे केली की कामाच्या नावाखाली हात धुऊन घेतले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या परिस्थितीमुळे शहरात कधीही चिकलठाण्यातील घटनेची पुनरावृत्तीचा धोका नाकारता येत नाही.
महावितरणच्या नावात ‘वितरण’ असले, तरी गेल्या काही वर्षांत या विजेच्या वितरणापेक्षा ‘मरण’ अधिकच वाट्याला येत असल्याचीही चिंताजनक परिस्थिती आहे. वीजपुरवठा सुरळीत ठेवणे, नागरिकांचे प्राण वाचवणे ही जबाबदारी ज्या यंत्रणेवर आहे, तीच आता नागरिकांच्या जिवाशी खेळ करताना दिसतेय. मान्सूनपूर्व तयारीचा डंका वाजवला जात असतानाही शहरातील किती तरी भागांत झुकलेले खांब झुकलेले, लोंबकळणाऱ्या तारा, झाडांमधून गेलेल्या विद्युत तारा, काही ठिकाणी उघड्या डीपी; अशी धोकादायक अवस्था आहे.
किती खर्च, हे गुलदस्त्यातच
मान्सूनपूर्व किती खर्च झाला, हे महावितरणच्या अधिकाऱ्यांनाच माहीत नाही. एका अधिकाऱ्यांकडून दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे बोट दाखविण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे मान्सूनपूर्व कामांवर खरेच खर्च करण्यात आला का, असा प्रश्न पडत आहे. परिमंडळात विजेचा झटका लागून अपघात घडलेले असूनही महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची ढिलाई संपत नाही.
विद्युत अपघातात ४५ मृत्यू
२०२४-२५ या वर्षात महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडळात विद्युत अपघातात ४२ व्यक्ती व एक बाह्यस्रोत कंत्राटी कामगार, अशा ४३ जणांचा मृत्यू झाला, तर दोन दिवसांपूर्वी चिकलठाण्यात दोघांचा मृत्यू झाला. तसेच विद्युत अपघातात १६ व्यक्ती जखमी झाले.
सतत चालणारे काम
मान्सूनपूर्व कामे करण्यात आली आहेत. ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. पाऊस पडला की पुन्हा झाडे वाढतात. तेव्हा पुन्हा झाडांच्या फांद्या कापल्या जातात. मान्सूनपूर्व कामांवर किती खर्च झाला, याची माहिती काढली जाईल.
- मनीष ठाकरे, अधीक्षक अभियंता, महावितरण