नापास विद्यार्थ्यांना पदवी वाटपाने शिक्षण क्षेत्रात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 00:35 IST2018-07-15T00:34:14+5:302018-07-15T00:35:59+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने नापास विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वाटप केल्याच्या धक्कादायक प्रकारामुळे विद्यापीठाच्या अब्रूची लक्तरे वेशीला टांगली आहेत. यात दोषी असणा-यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासह कुलगुरू, प्रकुलगुरू, कुलसचिव, परीक्षा संचालक, अधिष्ठातांना निलंबित करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली.

Degree allotment to students of disorder | नापास विद्यार्थ्यांना पदवी वाटपाने शिक्षण क्षेत्रात खळबळ

नापास विद्यार्थ्यांना पदवी वाटपाने शिक्षण क्षेत्रात खळबळ

ठळक मुद्देकारभारावर लोकप्रतिनिधी संतप्त : बदनामीस जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने नापास विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वाटप केल्याच्या धक्कादायक प्रकारामुळे विद्यापीठाच्या अब्रूची लक्तरे वेशीला टांगली आहेत. यात दोषी असणा-यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासह कुलगुरू, प्रकुलगुरू, कुलसचिव, परीक्षा संचालक, अधिष्ठातांना निलंबित करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली.
विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने नापास विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रांचे वाटप केल्याचा भंडाफोड ‘लोकमत’च्या शनिवारच्या (दि.१४) अंकात करण्यात आला. दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, तरच अशा प्रकारांना आळा बसेल, असेही मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी सांगितले. आमदार सुभाष झांबड म्हणाले की, विद्यापीठात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीला लागताना अगोदरच दुजाभाव सहन करावा लागतो. यात पुन्हा अशा प्रकारामुळे विद्यापीठाची बदनामी झाली, याचा जाब विधिमंडळात विचारला जाईल. आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर म्हणाले की, हा फौजदारी गुन्हा आहे. दोषींना सोडले जाणार नाही. विधिमंडळात अधिकाºयांच्या निलंबनाच्या घोषणेशिवाय शांत बसणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय सोमवारी विविध विद्यार्थी, प्राध्यापक संघटना आंदोलन करणार आहेत.
प्रशासनाची बेफिकिरी कायम
विद्यापीठाला शनिवारी (दि.१४) अधिकृत सुटी असल्यामुळे बहुतांश अधिकारी फिरकलेच नाहीत. गंभीर प्रकरण उघडकीस येऊनही कुलगुरू कळंब येथील नियोजित दौºयावर सकाळीच रवाना झाले. परीक्षा संचालकांना काही सहकाºयांना निरोप देऊन आॅफिसला येण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, परीक्षा संचालक सायंकाळी ४ वाजेपर्यंत आले नव्हते. प्रकुलगुरू काही वेळेसाठी कार्यालयात आले होते. अधिष्ठातांपैकी एक जणच विद्यापीठात होता. यामुळे प्रशासनाची बेफिकिरी शनिवारी दिसून आली.
दोषी कोण?
नापास विद्यार्थ्यांना पदव्या पाठविण्याच्या प्रकरणात दोषी कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे. विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच पदव्यांच्या छपाईचे आऊटसोर्सिंग केले आहे. विद्यापीठात मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ असलेल्या प्रिंटिंग प्रेसऐवजी खाजगी कंपनीला कशामुळे प्राधान्य देण्यात आले. यासाठी मागविण्यात आलेल्या निविदांमध्ये विद्यापीठास उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिकांचा पुरवठा करणाºयाच पुणेस्थित कंपनीलाच प्राधान्य देण्यात आले. हे देताना त्या कंपनीला चढ्या दराने निविदा देण्यास कोण आग्रही होते. प्रति पदवी २७ रुपयांऐवजी ९० रुपये देण्याच्या सूचना कोणी मांडल्या आदी मुद्यांवर चर्चा होत आहे.
कुलगुरूंच्या अडचणी वाढणार
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्यपालांनी माजी कुलगुरू एस.एफ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. चार कोटींची उचल, बारकोड उत्तरपत्रिकांची विनानिविदा खरेदी, अधिकार मंडळावरील नियुक्त्यांमुळे अगोदरच अडचणीत असलेल्या कुलगुरूंच्या समस्या या प्रकारामुळे वाढणार आहेत.
\\\
शिक्षण असो की उच्चशिक्षण या विभागांचा ‘विनोद’ झाला आहे. औरंगाबाद विद्यापीठ असो की, मुंबई विद्यापीठ. राज्यात सर्वत्र अशीच परिस्थिती आहे. औरंगाबादच्या विद्यापीठाबाबत तर अनेक तक्रारी असून, नापास विद्यार्थ्यांना पदव्या देणे हा तर अंधळा कारभार म्हणावा लागेल. औरंगाबादच्या विद्यापीठातील सावळ्या गोंधळाबाबत अधिवेशनात सरकारला जाब विचारणार आहे.
-धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

Web Title: Degree allotment to students of disorder