औरंगाबाद : जिल्ह्यातील १३६८ पैकी ५०३ गावांत कोरोना विषाणूचा संसर्ग पोहोचला. त्यापैकी ६७ गावांत ७ आणि १०१ गावांत १४, तर १५३ गावांत २८ दिवसांपासून एकही रुग्ण सापडला नाही. ३२१ गावांत रुग्णवाढ थांबली असली तरी १८२ गावांत संक्रमण सुरूच आहे. ७९२ रुग्ण ग्रामीणमध्ये, तर ११४५ रुग्ण शहरात उपचार घेत असल्याची माहिती प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांनी दिली.
ग्रामीण भागात कोरोनाबाधित सर्वाधिक रुग्ण तालुक्याच्या गावांसह शहरागलगतच्या मोठ्या बाजार गावांत आढळून येत आहेत. आतापर्यंत ११ हजार ८२ रुग्ण आढळले. त्यापैकी ८९२८ रुग्ण बरे होऊन घरी परतले, तर २१७ रुग्णांचा मृत्यू झाल्याने १९३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. १३६८ गावांपैकी एकूण ५०३ गावांत बाधित रुग्ण सापडले. त्यात ४२५ गावांत २५ पेक्षा कमी रुग्ण, २९ गावांत २५ ते ५० रुग्ण, ८ गावांत पन्नासपेक्षा अधिक तर १३ गावांत शंभरपेक्षा अधिक रुग्ण आढळले. त्यापैकी ३२१ गावांतील रुग्णवाढ थांबली असून, १८२ गावांतील १९३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी ६८२ रुग्ण २२ कोविड केअर सेंटर तर ११० रुग्ण ५ ग्रामीण जिल्हा कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून, उर्वरित ११४५ रुग्ण शहरातील रुग्णालयांत भरती आहेत. सौम्य व लक्षणे नसलेल्या रुग्णांना होम आयसोलेशनची सुविधाही दिली जात आहे. मृत्यूदर घटवणे व संक्रमण रोखण्यासाठी उपचारावर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, आरोग्य विभाग घरोघरी सर्वेक्षण करत असल्याची माहिती डॉ. गंडाळ यांनी दिली.
डबलिंग रेट २८.०२ दिवसगेल्या आठवड्याचा डबलिंग रेट २८.०२ दिवस तर आतापर्यंतच्या आढळलेल्या रुग्णसंख्येचा डबलिंग रेट ७६ दिवस असल्याची माहिती डॉ. वाघ यांनी दिली. जिल्ह्यातील रुग्णांसंदर्भातील माहिती संकलन, विश्लेषण व समन्वयासाठी ही वॉररूम कार्यरत आहे. वॉर रूम प्रमुख डॉ. वाघ व जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. जी. एम. कुडलीकर यांच्या मार्गदर्शनात काम सुरू आहे.
१०० पेक्षा अधिक रुग्णांची १३ गावेगंगापूर, कन्नड, सिल्लोड, वैजापूर, पैठण या तालुक्यांच्या गावांचा समावेश १०० पेक्षा अधिक रुग्ण आढळलेल्या यादीत झाला आहे. वडगाव कोल्हाटी, बजाजनगर, रांजणगाव शेणपुंजी, वाळूज, चितेगाव ही औद्योगिक परिसरातील तसेच औरंगाबाद शहरालगतची गावे आहेत. तसेच लासूरस्टेशन, अजिंठा, शिऊर या बाजाराच्या दृष्टीने मोठ्या गावांतही कोरोना संक्रमण चिंताजनक बनले आहे.
५० ते १०० रुग्ण असलेली ८ गावेपंढरपूर, करमाड, फुलंब्री, गणोरी, सावखेडा, जामगाव, बिडकीन, वडवळी येथे ५० ते १०० दरम्यान रुग्ण आढळून आले आहेत. ही सर्व गावे मोठी आहेत. येथील रुग्णवाढ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत.