"भाडं मारणार कधी अन् गॅस भरणार कधी?"; ७ तास रांगेत गेल्याने रिक्षाचालकांचे उत्पन्न निम्म्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 19:49 IST2026-03-24T19:48:55+5:302026-03-24T19:49:37+5:30
एलपीजी गॅससाठी रिक्षाचालकांचा ७-७ तास वनवास; गॅस पंपावर मध्यरात्रीपर्यंत रांगा

"भाडं मारणार कधी अन् गॅस भरणार कधी?"; ७ तास रांगेत गेल्याने रिक्षाचालकांचे उत्पन्न निम्म्यावर
छत्रपती संभाजीनगर: शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या एलपीजी गॅसच्या टंचाईने आता उग्र रूप धारण केले आहे. बीड बायपास परिसरासह शहरातील इतर ३ पंपांवर सोमवारी गॅस उपलब्ध झाला खरा, पण तो मिळवण्यासाठी रिक्षाचालकांना ६ ते ७ तास ताटकळत उभे राहावे लागत आहे. या भीषण रांगांमुळे रिक्षाचालकांचा व्यवसायाचा वेळ रांगेतच जात असून, त्यांचे दैनंदिन उत्पन्न निम्म्यावर आले आहे.
मध्यरात्री २ वाजता येतोय नंबर!
बीड बायपासवरील पंपावर रिक्षाचालकांचा अक्षरशः मुक्काम वाढला आहे. "काल संध्याकाळी ६ वाजता रांगेत लागलो होतो, रात्री २ वाजता नंबर आला आणि तेव्हा गॅस मिळाला," अशी व्यथा रवी सावंत आणि सुनील दळवी या रिक्षाचालकांनी मांडली. शहरातील काही पंप बंद असल्याने उपलब्ध असलेल्या पंपांवर हजारो रिक्षांची गर्दी होत आहे.
पेट्रोलवर रिक्षा चालवण्याची वेळ
गेल्या ४-५ दिवसांपासून एलपीजी उपलब्ध नसल्याने अनेक चालकांना नाइलाजास्तव महागड्या पेट्रोलवर रिक्षा चालवावी लागत होती. त्यामुळे मिळणारे भाडे आणि इंधनाचा खर्च याचा मेळ बसत नव्हता. सोमवारी सायंकाळी ७ च्या सुमारास काही ठिकाणी पुरवठा सुरू झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि रिक्षाचालकांनी पंपांकडे धाव घेतली. मात्र, रात्री उशिरापर्यंत या रांगा कमी होण्याची चिन्हे दिसत नव्हती.