जिल्हाधिकाऱ्यांचा महसुली यंत्रणेवरच 'सर्जिकल स्टाइक'; लेटलतीफ १३४ जणांचा पगार कापणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 13:14 IST2025-06-14T13:13:44+5:302025-06-14T13:14:54+5:30
कार्यालयात येण्याची वेळ संपताच जिल्हाधिकाऱ्यांनी प्रथम कार्यालयांचे दरवाजे बंद केले. मग कर्मचारी किती वाजता येतात, हे पाहण्यासाठी त्यांनी पायऱ्यांवरच खुर्ची टाकून ठिय्या दिला.

जिल्हाधिकाऱ्यांचा महसुली यंत्रणेवरच 'सर्जिकल स्टाइक'; लेटलतीफ १३४ जणांचा पगार कापणार
छत्रपती संभाजीनगर : किरकोळ कामांसाठी थेट जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना नागरिकांचे वारंवार फोन येण्याचे प्रमाण वाढल्याने त्यांनी ९ तालुक्यांमध्ये प्रमुख अधिकाऱ्यांचे पथक नेमून तहसीलनिहाय यंत्रणेचे शुक्रवारी ‘सर्जिकल स्टाइक’ केले. जिल्हाधिकारी स्वत: फुलंब्री तहसीलच्या पायरीवर सकाळी ०९:०० वाजेलाच जाऊन बसले होते. जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शुक्रवारी केलेल्या कार्यालयांच्या झाडाझडती १८८ पैकी तब्बल १३४ कर्मचारी वेळेत न आल्याचे आढळले. या लेटलतीफ आणि गैरहजर कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तसेच याची नोंदही सर्व्हिस बूकला घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या ‘सर्जिकल स्टाइकमुळे’ प्रशासनात खळबळ उडाली.
पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी पैठण, उपजिल्हाधिकारी नीलेश अपार यांनी गंगापूर, अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे यांनी वैजापूर, उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे यांनी सोयगाव, उपजिल्हाधिकारी सुचिता शिंदे यांनी खुलताबाद, उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी यांनी सिल्लोड, तर उपजिल्हाधिकारी संगीता राठोड यांनी अपर तहसील कार्यालय आणि छत्रपती संभाजीनगर ग्रामीण तहसील कार्यालयात जाऊन झाडाझडती घेतली. पैठण येथील १ आणि खुलताबाद येथील ३, असे ४ जण रजेवर असल्याचे आढळून आले. जिल्हाधिकाऱ्यांनी रात्रीच अधिकाऱ्यांना तपासणीचे निर्देश दिले होते. ऑनलाइन हजेरी यंत्रणा बंद असल्यामुळे कर्मचारी वेळेत येत नसल्याचे निदर्शनास आले.
जिल्हाधिकारी तासभर बसले पायरीवर
जिल्हाधिकारी सकाळी ०९:४५ वाजताच फुलंब्री तहसील कार्यालयात गोपनीयरीत्या पोहोचले. या इमारतीमध्ये तहसील, भूमी अभिलेख, दारूबंदी, कृषी कार्यालय, पुरवठा विभाग, कोषागार, सहकार विभाग आदी सात विभागांचे कार्यालय आहे. कार्यालयात येण्याची वेळ संपताच जिल्हाधिकाऱ्यांनी प्रथम त्या कार्यालयांचे दरवाजे बंद केले. मग कर्मचारी किती वाजता येतात, हे पाहण्यासाठी त्यांनी पायऱ्यांवरच खुर्ची टाकून ठिय्या दिला. जिल्हाधिकारी कर्मचाऱ्यांची वाट पाहत असताना १०:०० वाजेच्या आत केवळ नायब तहसीलदार संजीव राऊत यांच्यासह आणखी दोन कर्मचारी वेळेवर पोहोचले. अनेक जण गैरहजर होते. बाकीचे एक- एक करून येत होते. उशिरा आलेल्या कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी उशिराचे कारण विचारले. मात्र, त्यांना उत्तर देता आली नाही. जिल्हाधिकाऱ्यांना समोर पाहून उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. काहींनी माफी मागण्याचाही प्रयत्न केला. तहसील कार्यालयातील १६ पैकी ३ कर्मचारी १०:०० वाजेच्या आत पोहोचले, तर पंचायत समितीमधील ४५ पैकी केवळ १० कर्मचारी वेळेवर आले होते.
सोयगावच्या तहसीलदार मनीषा मेने याच नियमित गैरहजर राहत असल्याची तक्रार भाजपचे शहराध्यक्ष योगेश पाटील यांनी तपासणीसाठी आलेले अधिकारी बंगाळे यांच्याकडे केली. यासंदर्भातील लेखी निवेदन पाटील यांनी दिले.
तालुका..... कर्मचारी.... उपस्थित..... गैरहजर
फुलंब्री..... १६............. २................१४
पैठण...... २२........... ९..................१२
गंगापूर....३०............ ४................२६
वैजापूर.........२०........ ९..............११
सोयगाव...........१५......... ७..........८
खुलताबाद..........२१............२......१९
छत्रपत्री संभाजीनगर (ग्रामीण)..... २५.... ६....... १९
छत्रपत्री संभाजीनगर..... ६......२....... ४
एकूण...............१८८.......... ५३...........१३४
एक दिवसाचे वेतन कपात..
ग्रामीण भागातील नागरिक आपल्या कामांसाठी महसूल कार्यालयात येतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी दिलेेल्या वेळेत येणे अपेक्षित आहे. उशिरा येणाऱ्या आणि गैरहजर असलल्या कर्मचाऱ्यांना नोटिसा देऊन त्यांच्याकडून खुलासा मागविण्याचे निर्देश दिले आहेत, तसेच या कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करून त्याची नोंद सर्व्हिस बूकला घेण्याचे सांगितले आहे. कर्मचाऱ्यांमध्ये सुधारणा झाली नाही, तर निलंबनाचीही कार्यवाही केली जाईल,
-दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी