हर्सूल तलावावर 'ब्लॅक संडे'! मित्रांना वाचवायला गेला अन् स्वतःचाही जीव गमावला; एकूण चार बळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 17:10 IST2026-04-06T17:06:40+5:302026-04-06T17:10:02+5:30
तीन मृतदेह काढून घाटी रुग्णालयात पाठविल्यानंतर अग्निशमन दलाचे पथक माघारी निघाले होते. तोपर्यंत त्यांना पुन्हा एकाने हर्सूल तलावात उडी घेतल्याची माहिती कळविली.

हर्सूल तलावावर 'ब्लॅक संडे'! मित्रांना वाचवायला गेला अन् स्वतःचाही जीव गमावला; एकूण चार बळी
छत्रपती संभाजीनगर : हर्सूल तलावातील पाण्यात बुडून चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. या दुर्घटनेत पोहण्यासाठी गेलेले दोन मित्र बुडाले. त्या दोघांना वाचविण्यासाठी गेलेला तरुणही त्याच्यासह बुडाला. त्यात तिघांचाही मृत्यू झाला. त्या दोघांच्या सोबतच्या एका मित्राने नातेवाइकांना माहिती दिली. अग्निशमन दलाने तिघांचे मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर, काही वेळातच एका तरुणाने तलावात उडी घेतली. त्यात त्याचाही मृत्यू झाला. ही घटना ३ ते ३:३० वाजण्याच्या दरम्यान घडल्याची माहिती हर्सूल पोलिसांनी दिली.
अफान इस्माईल खान (१५), मैशिद उर्फ आदिल मोहसीन शेख (१३, दोघेही रा.निजामगंज, भवानीनगर) या दोन मित्रांसह त्यांना वाचविण्यासाठी गेलेला तरुण करण रामचंद्र मोरे (२२, रा.अंबरहील, जटवाडा रोड) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव यश संदीप देहाडे (२५, रा.सिद्धार्थनगर, एन-१२, सिडको) असल्याची माहिती हर्सूल पोलिस ठाण्याच्या निरीक्षक स्वाती केदार यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भवानीनगर निजामगंज काॅलनीत समोरासमोर राहणारे अफान, मैशिद आणि वासिफ हे तिघे मित्र रविवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास हर्सूल तलावात पोहण्यासाठी गेले होते. अफान आणि मैशिद हे दोघेच पाेहण्यासाठी पाण्यात उतरले. वासिफला पोहता येत नसल्यामुळे तो तलावाच्या कडेलाच बसला होता. त्याच वेळी पोहण्यासाठी करण माेरे हा तरुण आला होता. अफान आणि मैशिद एकमेकांचे हात धरून तलावात उतरले. काही अंतर आत गेल्यानंतर त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. दोघेही तलावाच्या खोल खड्ड्यात गाळात अडकले. दोन तरुण एकाच वेळी पाण्यात बुडत असल्याचे पाहून करण मोरे यानेही पाण्यात उडी घेऊन दोघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुर्दैवाने तिघेही काही कळण्याच्या आत पाण्यात बुडाले. पाण्याबाहेर बसलेल्या वासिफने आरडाओरड सुरू केली. मात्र, परिसरात कोणीही नव्हते. वासिफने अफानच्या वडिलांना मोबाइलवरून हर्सूल तलावात अफान आणि मैशिद हे दोघे बुडत असल्याची माहिती दिली. मनपाचे सुरक्षारक्षक राजेंद्र गवळे यांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली. त्यानंतर, काही वेळातच एन-९ येथील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने तत्काळ पाण्यात उतरत तिघांचा शोध घेत मृतदेह पाण्याबाहेर काढले व तपासणीसाठी घाटी रुग्णालयात हलवले. तोपर्यंत तरुणांचे नातेवाईकही घटनास्थळी दाखल झाले.
अर्ध्या रस्त्यातून अग्निशमन पथक माघारी फिरले
तीन मृतदेह काढून घाटी रुग्णालयात पाठविल्यानंतर अग्निशमन दलाचे पथक माघारी निघाले होते. तोपर्यंत त्यांना पुन्हा एकाने हर्सूल तलावात उडी घेतल्याची माहिती कळविली. त्यामुळे हे पथक अर्ध्या रस्त्यातून माघारी फिरले. यश देहाडे या तरुणाने तलावाच्या फिल्टरजवळच्या कठड्यावरून तलावात उडी घेतली होती. ही बाब सुरक्षारक्षकाने बघितली. त्याने तरुणाला वाचवण्यासाठी काठी दिली. मात्र, काही क्षणात तरुण पाण्यात बुडाला. त्याला अग्निशमनच्या जवानांनी पाण्यातून बाहेर काढत तत्काळ घाटीत हलविले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. यावेळी उपअग्निशमन केंद्र अधिकारी विजय राठोड, ड्युटी अधिकारी वैभव बाकडे, लक्ष्मण कोल्हे, अग्निशमन जवान अशोक पोटे, विक्रम भुईगल, शिवाजी काकडे, गजानन गावंडे आदींचा पथकात समावेश होता. या घटनेची हर्सूल ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
घाटीत गर्दी, निजामगंजवर शोककळा
थोड्या अंतरानेच चार तरुणांचे मृतदेह घाटी रुग्णालयात पाठविले. तेव्हा निजामगंजमधील तरुणांच्या नातेवाइकांनी घाटी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. इतर दोन जणांच्या मृतदेहांची ओळख पटविण्यात पोलिस प्रशासन प्रयत्न करीत होते. रात्री १० वाजण्याच्या सुमारास इतर दोघांची ओळख पटविण्यात यश आले. पोहण्यासाठी सोबत गेलेल्या निजामगंजमधील मृत्यू झालेल्या दोन मित्रांचे घर समोरासमोर होते. त्या ठिकाणी परिसरातील नागरिकांनीही सांत्वनासाठी मोठी गर्दी केल्याचेही दिसून आले.