मोठी बातमी! २,६०० कोटींतून औट्रम घाटात १२.५ किमी लांबीचा बोगदा होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 19:12 IST2025-06-24T19:11:55+5:302025-06-24T19:12:46+5:30

अलायन्मेंट मंजुरीसाठी ‘एनएचएआय’च्या मुख्यालयाकडे; मंजुरी मिळताच डीपीआर अन् निविदा

Big news! A 12.5 km long tunnel will be built in Outram Ghat at a cost of Rs 2,600 crores | मोठी बातमी! २,६०० कोटींतून औट्रम घाटात १२.५ किमी लांबीचा बोगदा होणार

मोठी बातमी! २,६०० कोटींतून औट्रम घाटात १२.५ किमी लांबीचा बोगदा होणार

छत्रपती संभाजीनगर : सोलापूर-धुळे महामार्ग क्र. ५२ वरील कन्नड येथील औट्रम घाटात ‘एनएचएआय’च्या माध्यमातून १२.५ किमी अंतरात बोगदा बांधण्यासाठी तयार केलेले अलायन्मेंट मंजुरीसाठी एनएचएआयच्या (नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडिया) मुख्यालयाकडे पाठविण्यात आले. २,६०० कोटींतून बोगद्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. अलायन्मेंटला मंजुरी मिळताच डीपीआर अंतिम होईल, त्यानंतर निविदा प्रक्रियेची तयारी होईल.

४ एप्रिल ते २ जून रोजीपर्यंतचा कालावधी औट्रम घाटात रेल्वेमार्ग आणि बोगदा बांधणी एकत्रित बांधणीच्या प्रस्तावाच्या चर्चा आणि बैठकीत गेला. हा प्रस्ताव येण्यापूर्वीच एनएचएआयचे काम फार पुढे गेलेले होते. परंतु दाेन महिन्यांतील चर्चांमुळे एनएचएआयचा अलायन्मेंटचे प्रकरण रेंगाळले. आता रेल्वे आणि एनएचएआयचे काम सोबत होणार नसल्यामुळे फक्त एनएचएआयकडून २,६०० कोटींतून बोगदा बांधण्याचा प्रस्ताव निश्चित होईल. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्यात नाशिकला जोडणाऱ्या नऊ मार्गांप्रकरणी एक बैठक होऊन औट्रम घाटात पहिल्या टप्प्यात बोगदा बांधण्याचे ठरले.

जड वाहतुकीस घाट अडीच वर्षांपासून बंद
जड वाहतुकीस घाट अडीच वर्षांपासून बंद आहे. बोगदा किंवा पर्यायी मार्ग नसल्याने ११० किलोमीटर अंतराचा फेरा मारून २२ हजार वाहने रोज ये-जा करीत आहेत. भविष्यातील औद्योगिक उत्पादनामुळे या महामार्गावरून तब्बल चाळीस हजार वाहनांची वाहतूक होईल. त्यामुळे घाटातील बोगद्याचे काम लवकर होणे गरजेचे आहे. दीड दशकापासून हा प्रकल्प रेंगाळला असून, मराठवाड्यातील औद्योगिक व दळणवळणासह देशाच्या उत्तर-दक्षिण दिशांना जोडणारा हा मार्ग आहे.

प्रस्तावित रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण सुरू
छत्रपती संभाजीनगर-चाळीसगाव प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी कन्नड तालुक्यातील चापानेर, जळगाव घाट, टाकळी लव्हाळी भागात रेल्वेच्या वतीने सर्वेक्षण सुरू आहे. सर्वेक्षणाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली असून, हे प्राथमिक सर्वेक्षण असून आणखी इतर ठिकाणांहूनही सर्वेक्षण होणार असल्याचे हे काम करणारे झारखंड राज्यातून आलेल्या सर्व्हे करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. या भागातून रेल्वेमार्ग गेल्यास कन्नड तालुक्यातील गावांच्या विकासाला चालना मिळेल.

प्रस्ताव मंजुरीची प्रतीक्षा
अलायन्मेंट मंजुरीसाठी एनएचएआयच्या मुख्यालयाकडे पाठविले आहे. मंजुरीची प्रतीक्षा आहे. रेल्वे विभागाची स्वतंत्र मोजणी सुरू असेल, एनएचएआयचा स्वतंत्र प्रस्ताव आहे.
- रवींद्र इंगोले, प्रकल्प संचालक, एनएचएआय

Web Title: Big news! A 12.5 km long tunnel will be built in Outram Ghat at a cost of Rs 2,600 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.