६२ रुपयांचा ऑटो एलपीजी १२० रुपये लिटरपर्यंत; तरी छ. संभाजीनगरातील २८ पंप कोरडेठाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 19:53 IST2026-04-02T19:53:13+5:302026-04-02T19:53:25+5:30
रिक्षाचालकांचे कंबरडे मोडले! महिनाभरात ऑटो एलपीजीचे दर दुप्पट, शहरात ३५ हजार रिक्षांची चाके थांबणार?

६२ रुपयांचा ऑटो एलपीजी १२० रुपये लिटरपर्यंत; तरी छ. संभाजीनगरातील २८ पंप कोरडेठाक
छत्रपती संभाजीनगर : प्रदूषण कमी करणारे ऑटो एलपीजी महिनाभरा आधी सर्वात स्वस्त इंधन समजले जात होते. मात्र,पश्चिम आशियातील युद्धामुळे मागील महिन्याभरात ‘गणित’ बिघडले. ६२ रुपये लिटरने विक्री होणारा ऑटो एलपीजी हळूहळू किंमती वाढून बुधवारी चक्क १२० रुपये लिटरपर्यंत जाऊन पोहोचला आहे. या किमतीतही एलपीजी मिळत नाही. यामुळे मागील १४ दिवसांपासून शहरातील २८ पेट्रोलपंपावर ‘आणीबाणी’ची परिस्थिती आहे.
नेमकी अडचण काय ?
ऑटो एलपीजी पंपचालकांनी नमूद केले की, ऑटो एलपीजीची खासगी कंपन्याकडून खरेदी व विक्रीला परवानगी आहे. आयातदारांकडून ऑटो एलपीजी पंपचालक खरेदी करतात. यावर केंद्र व राज्य सरकारचे नियंत्रण नसते. यामुळे महिनाभराआधी पंपावर ऑटो एलपीजी अवघ्या ६२ रुपये लिटरने मिळत होता. मात्र, इस्राइल व अमेरिकेने इराणवर हल्ला केला तेव्हा पासून एलपीजीचे भाव भडकले. जहाजातून येणाऱ्या एलपीजी पैकी सरकार ७५ टक्के इंधन स्वत: खरेदी करीत आहे. त्यातील फक्त १५ टक्के ऑटो एलपीजी पंपांच्या वाट्याला येत आहे. त्यात दुप्पट भाववाढीने रिक्षाचालकांमध्ये संताप आहे, तर दुसरीकडे पंपावर एलपीजीचा पुरवठा नाही. तिसरीकडे सध्याच्या चढ्या दरात एलपीजी विकले तर सरकार पंप सील करण्याची कारवाई करु शकते. यामुळे ऑटो एलपीजी पंप मागील १४ दिवसांपासून बंदच आहे.
एलपीजी पुरवठा करावा, त्याच भावात विकू
शहरातील २८ ऑटो एलपीजी पंप मालकांनी एकत्र येऊन आज पत्रपरिषद घेतली. ऑटो एलपीजी मिळत नसल्याने शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण, विस्कळीत पुरवठा व दुप्पट भाववाढीमुळे पंप बंद असल्याने शहरातील सुमारे ३५ हजार रिक्षाचालकांच्या उदारनिर्वाहाचा प्रश्न आहे.
१) केंद्र व राज्यसरकाने गंभीर परिस्थितीची दखल घ्यावी.
२) पेट्रोलियम मंत्रालयाने तेल वितरण कंपन्या भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम व इंडियन ऑइलला आदेश देऊन ऑटो एलपीजी पंपांना पुरवठा करण्यास सांगावे.
३) कंपन्या ज्या भावात सांगतील त्या भावात एलपीजी वितरण करण्याची हमी पंपमालकांनी दिली.
पत्रपरिषदेत ऑटो एलपीजी पंपमालक मनीष उमाळे, पराग भाटिया, आदित्य पांडे, मयूर जैस्वाल, मोहम्मद फिरोज, दिशांत दयालानी, दक्ष रत्नपारखी, गौरव जैस्वाल यांची उपस्थिती होती.