औरंगाबादकर काही मीटरचे अंतर वाचविण्यासाठी घालतात प्राण धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 21:38 IST2018-06-18T21:38:42+5:302018-06-18T21:38:57+5:30
राँगसाईड वाहन चालविल्यामुळे अपघाताचा धोका अधिक असतो, ही बाब माहीत असूनही शेकडो वाहनचालक शहरातील विविध रस्त्यांवर बिनधास्तपणे चुकीच्या दिशेने वाहने पळवीत असल्याचे दररोज निदर्शनास येत आहे.

औरंगाबादकर काही मीटरचे अंतर वाचविण्यासाठी घालतात प्राण धोक्यात
- बापू सोळुंके
औरंगाबाद : राँगसाईड वाहन चालविल्यामुळे अपघाताचा धोका अधिक असतो, ही बाब माहीत असूनही शेकडो वाहनचालक शहरातील विविध रस्त्यांवर बिनधास्तपणे चुकीच्या दिशेने वाहने पळवीत असल्याचे दररोज निदर्शनास येत आहे. विशेष म्हणजे चुकीच्या दिशेने जाताना ट्रकखाली येऊन बीड बायपास रस्त्यावर गुरुवारी दुपारी एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. परंतु त्याच रस्त्यावरून वाहनचालक राँगसाईडने बिनधास्त जात होते. त्यांच्यावर अपघाताचा काहीही परिणाम दिसून आला नाही.
अपघात टाळण्यासाठी प्रत्येक वाहनचालकांनी वाहतूक नियम पाळणे आवश्यक आहे. शासनाने वाहनचालकांसाठी वाहतूक नियमावलीही तयार केली आहे. आरटीओकडून वाहन चालविण्याचे लायसन्स घेण्यापूर्वी वाहतूक नियमांची परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच प्रत्येक व्यक्तीला वाहन चालविण्याचे लायसन्स प्राप्त होते. मात्र, लायसन्स हातात मिळाल्यानंतर वाहतूक नियम पायदळी तुडविण्यावरच अनेकांचा भर असल्याचे दिसून येतो. प्रत्येक वाहतूक सिग्नलवर न थांबता वाहने पळविणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, असे बेशिस्त वाहनचालक नियम पाळणाऱ्या वाहनचालकांना धडकून स्वत:सह इतरांचे प्राणही धोक्यात घालतात.
अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या अनेक बाबींपैकी राँगसाईड वाहने चालविणे हे प्रमुख कारण आहे. गुरुवारी बीड बायपास रस्त्यावर राँगसाईडने जाणाऱ्या दुचाकीस्वाराची समोरून येणाऱ्या ट्रकबरोबर टक्कर झाली आणि या घटनेत त्यांना प्राणास मुकावे लागले. बीड बायपास रस्त्यावर राँगसाईड वाहने पळविणाऱ्यांमध्ये जणू स्पर्धाच लागलेली दिसते. बाळापूर फाटा ते महानुभाव आश्रम चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने राँगसाईड वाहने पळविण्याचे दहा ठिकाण आहेत. राँगसाईडने धावणाऱ्या वाहनांमुळे गतवर्षी एमआयटी कॉलेजजवळ एका मोपेडस्वार विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता.
जालना रस्त्यावरील अग्रसेन महाराज चौक ते उच्च न्यायालय वाहतूक सिग्नल, तसेच उच्च न्यायालय सिग्नलकडून राज पेट्रोलपंपादरम्यान राँगसाईड वाहनचालक पळताना दिसतात. विशेष म्हणजे सिग्नलवर वाहतूक पोलीस असेल तर राँगसाईड वाहतूक बंद असते. यासोबतच जिल्हा बँकेसमोर आणि जिल्हा कोर्टासमोरून अन्वीकर बिल्डिंगच्या दिशेने राँगसाईड वाहने सुसाट असतात. नूतन कॉलनीतून क्रांतीचौकाकडे जाणारा रस्ता, तीन वर्षांपूर्वी बंजारा चौक बंद क रण्यात आला. तेव्हापासून अनेक वाहनचालक जालना रोडवरील अमरप्रीत चौकात जाण्यासाठी समाजकल्याण भवनसमोरून राँगसाईडने वाहने नेणे पसंत करतात. मिलकॉर्नर चौकाकडून तिबेटियन स्वेटर मार्केटसमोरून शेकडो रिक्षाचालक, दुचाकीचालक राँगसाईडने मध्यवर्ती बसस्थानकाकडे जातात. तसेच बसस्थानक आणि सिद्धार्थ उद्यानाकडून कार्तिकी हॉटेलकडे वाहनचालक राँगसाईडने जातात.
वाहतूक पोलिसांकडून कारवाई अपेक्षित
अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या राँगसाईड स्पॉटकडे वाहतूक पोलिसांनी कायमस्वरुपी उपाय करणे आवश्यक आहे. वाहतूक पोलीस तेथे उपस्थित असेल तर राँगसाईड वाहतूक बंद होते.