Aurangabad: लसीमुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप; पित्याचा 1 हजार कोटींचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 11:44 IST2022-02-02T11:24:17+5:302022-02-02T11:44:40+5:30

याचिकेत पित्याने केंद्र सरकार, राज्य सरकारसोबतच लस निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट आणि सिरमचे भागीदार बिल गेट्स यांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे.

Aurangabad: Girl allegedly killed by vaccine; Father's claim of Rs 1,000 crore | Aurangabad: लसीमुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप; पित्याचा 1 हजार कोटींचा दावा

Aurangabad: लसीमुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप; पित्याचा 1 हजार कोटींचा दावा

औरंगाबाद : मुलीचा कोविशिल्ड लसीच्या दुष्परिणामामुळे मृत्यू झाल्याचा दावा करत औरंगाबादचा रहिवासी असलेल्या एका पित्याने १ हजार कोटींच्या नुकसानभरपाईचा दावा करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. लस बनवणाऱ्या कंपन्यांनी तसेच सरकारनेही ही लस सुरक्षित असल्याचा दावा केला होता. मात्र कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली आणि मुलीचा मृत्यू झाला, असा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे.

या याचिकेत केंद्र सरकार, राज्य सरकारसोबतच लस निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट आणि सिरमचे भागीदार बिल गेट्स यांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे. दिलीप लुणावत असे या याचिकाकर्त्यांचे नाव असून त्यांच्या कन्या डाॅ. स्नेहल लुणावत नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील दंत महाविद्यालयात कार्यरत होत्या. कोरोना योद्धा असल्याने स्नेहल यांनी २८ जानेवारी २०२१ रोजी लस घेतली. परंतु १ मार्च २०२१ रोजी त्यांचा मृत्यू झाला. कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या दुष्परिणामांमुळेच मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा करत स्नेहल यांच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एआयआयएमएस) च्या संचालकांनी केलेल्या दाव्यांनुसार, कोरोना प्रतिबंधित लसी या संपूर्णतः सुरक्षित असल्याचे म्हटले होते. परंतु खोट्या आणि चुकीच्या दाव्यांमुळेच आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा लुणावत यंनी याचिकेत केल्याचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

मुलीला न्याय मिळावा

केंद्र सरकारच्या एइएफआय या समितीने मुलीचा कोविशिल्ड लसीच्या दुष्परिणामांमुळे मृत्यू झाल्याचे मान्य केल्याचेही या याचिकेत नमूद केले आहे. त्यामुळे आपल्या मुलीला न्याय मिळावा आणि इतर लोकांचेही प्राण वाचावेत म्हणून आपण ही याचिका दाखल करत असल्याचे लुणावत यांनी म्हटले आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Web Title: Aurangabad: Girl allegedly killed by vaccine; Father's claim of Rs 1,000 crore