'या जन्मात तरी भाजपचा महापौर मुंबईत नाही!' अंबादास दानवेंचा थेट पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 16:45 IST2025-12-06T16:40:52+5:302025-12-06T16:45:01+5:30
भाजपच्या नेत्यांनी मुंबई महानगरपालिकेत महायुतीचा महापौर बसेल, असा दावा केला होता.

'या जन्मात तरी भाजपचा महापौर मुंबईत नाही!' अंबादास दानवेंचा थेट पलटवार
छत्रपती संभाजीनगर: ठाकरे गटाचे आमदार तथा नेते अंबादास दानवे यांनी आज विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवर अत्यंत आक्रमक भाष्य केले. मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदावरून भाजपने केलेल्या दाव्याला त्यांनी थेट आव्हान देत, "या जन्मात तरी भाजपचा महापौर मुंबईत बसणार नाही," असा घणाघात केला. तसेच, मतचोरी, हापूस आंब्याचा वाद आणि मुख्यमंत्री दौऱ्यातील शिष्टाचार भंगावरही त्यांनी टीकास्त्र सोडले.
'बाजारात तुरी नाही...' मुंबईच्या महापौरांवरून शाब्दिक युद्ध
भाजपच्या नेत्यांनी मुंबई महानगरपालिकेत महायुतीचा महापौर बसेल, असा दावा केला होता. त्यावर बोलताना अंबादास दानवे यांनी संजय जाधव आणि लोढा यांच्या वक्तव्याला लक्ष्य केले. "बाजारात तुरी नसताना यांचा महापौर...दोघांचाही महापौर बसणार नाही. ठाकरेंच्या विचारांचाच महापौर मुंबईत बसणार. या जन्मात तरी त्यांचा महापौर मुंबईत बसणार नाही," असे थेट आव्हान दानवे यांनी दिले. "मराठी माणूसच महापौर बनेल," असेही त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच भाजपचे नेते लोढा हे सर्व पक्ष चालवतात, या वक्तव्यावर बोलताना दानवे म्हणाले, "लोढा हे बिल्डर आहेत. त्यांना त्यांचे सर्व धंदे लपवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची चापलूसी करावी लागते."
तपोवन वृक्षतोडीवरून भाजपचा 'दुटप्पीपणा' उघड
अयोध्या राम मंदिरावरील पताका आणि तपोवनातील वृक्षतोड यावरून दानवे यांनी भाजपच्या धोरणावर तीव्र टीका केली. "राम मंदिरावर जो पताका लावण्यात आला, त्यावर वृक्षाचे चित्र आहे, जो पर्यावरणाचा संदेश देतो. तपोवन हे श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेले क्षेत्र आहे. असे असताना पताका लावून आठ दिवस झाले आणि त्यांच्याच पक्षातील लोक या तपोवनातील पूर्ण वृक्षांचा नायनाट करण्यासाठी निघाले आहेत," असे म्हणत त्यांनी भाजपचा दुटप्पीपणा यातून स्पष्ट होत असल्याचे सांगितले.
हापूस आंबा:
"हापूस आंबा कोकणाचा, रत्नागिरीचा आहे, हे जगाला सांगण्याची गरज नाही. हापूस आंबा महाराष्ट्राची नव्हे, देशाची शान आहे. असे असताना हापूस आंबा आता गुजरातचा, हे नवीन सुरू झाले आहे," असे म्हणत त्यांनी गुजरातच्या दाव्याला खोडून काढले.
पालकमंत्र्यांचा शिष्टाचार भंग
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला पालकमंत्री गैरहजर असण्यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. "मुख्यमंत्री आल्यावर पालकमंत्री असलेच पाहिजे, हा शासकीय कार्यक्रम होता. शिष्टाचार हा फक्त पुस्तकात लिहिला आहे, त्याचे पालन होत नाही," असे ते म्हणाले.