आष्टी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाचे थैमान, हाताशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 17:09 IST2022-10-13T17:08:34+5:302022-10-13T17:09:42+5:30

चांगली वाढ झालेली पिके संकटात आल्याने बळीराजाचे दु:ख काही संपत नाही, अशी स्थिती आहे.

Ashti taluka was lashed by torrential rains, causing huge damage to prepared crops | आष्टी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाचे थैमान, हाताशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान

आष्टी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाचे थैमान, हाताशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान

- नितीन कांबळे 
कडा (बीड) :
आष्टी तालुक्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. मागिल आठ दिवसांपासून रोज पाऊस पडत आहे. आज सकाळी तर पांढरी, करंजी, पांगुळगव्हाण, क-हेवडगांव, क-हेवाडी, मातकुळी, वनवेवाडी, पोखरी, हाजीपुर या परिसरास ढगफुटी सदृश्य पावसाने अक्षरशः झोडपून काढले. त्यामुळे नदी-नाल्यांना पुर आल्याने वाहतूक ठप्प आहे. अनेक  गावांचा संपर्क देखील तुटला आहे. ग्रामस्थ, विद्यार्थी, नौकरदार, दुध उत्पादक शेतकरी पावसामुळे घरातच अडकून पडले आहेत. 

आष्टी महसूल मंडळ परिसरात आज सकाळी 9 वाजेपासून मुसळधार पाऊस सुरु झाला. शेतक-यांचे अतोनात नुकसान झालं शेतांना तळ्यांचे स्वरुप प्राप्त झाल्याने सोयाबीनला कोंब येण्याची भीती आहे. कापुस,कांदा,तुर पीक शेतात झोपल्याने झडण्यासह पाण्यात कुजण्याची भीती आहे. चांगली वाढ झालेली पिके अशा पद्धतीने संकटात आल्याने बळीराजाचे दु:ख काही संपत नाही, अशी स्थिती आहे.

सोलेवाडीचा पुल तुटल्याने 8 ते 10 गावांचा संपर्क तुटला 
तालुक्यातील सोलेवाडी येथील नगर जिल्ह्यातील गावांना जोडणारा पुल परतीच्या पावसाने वाहुन गेला आहे. सकाळपासून पूर आल्याने या मार्गावरील जामगांव, देविगव्हाण, वाळुंज, डोणगांव, अरणगांव, पारेवाडी, या गावातील विद्यार्थी, नौकरदार, नागरिक वाहतूक दुपारपर्यंत ठप्प आहे. या गावांचा संपर्क तुटला आहे. 

पांढरी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस 
सकाळपासूनच पांढरी परिसरात ढगफुटी सदृश्य पावसाने थैमान घातले असून गावातील शेतकर्‍यांनी कांदा, ज्वारी पिकाची पेरणी केली आहे. व कापुस तुर, कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. सर्व पिके पाण्यात असून जमिन खोदून गेली आहे. बळीराजाचे आस्मानी संकटाने अतोनात नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांना तात्काळ पंचनामे करून मदत ही दिवाळी पूर्वी द्यावी जेणेकरून बळीराजाची हि दिवाळी गोड होईल.
– सुधिर पठाडे (सरपंच, पांढरी)

विमा कंपनीने स्वत: पंचनामे करावेत-आ.धस
परतीच्या पावसामुळे आष्टी तालुक्यातल्या काही मंडळात प्रचंड नुकसान झाले आहे. जमिनी खरडून वाहून गेल्या आहेत. प्रशासन यावर नजर ठेवून असली तरी पुढचे काही दिवस पंचनाम्याला जातील. खरिपाचे पिक हातातून गेल्याचे सांगत विमा कंपनी शेतकर्‍यांना नुकसानीचे फोटो अपलोड करायला सांगते परंतू शेतकर्‍यांना ते जमत नाही. त्यामुळे स्वत: कंपनीने या भागात येवून पंचनामे करत अपलोड करावे. अशी मागणी आ.सुरेश धस यांनी केली.

Web Title: Ashti taluka was lashed by torrential rains, causing huge damage to prepared crops