बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला करताच कुत्र्यांनी घेतली झेप; बलिदान दिलं पण मालकाला वाचवललं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 16:08 IST2025-11-24T16:07:02+5:302025-11-24T16:08:51+5:30
उंडणगावातील घटना, बिबट्याच्या हल्ल्यात एका कुत्र्याचा मृत्यू, एक जखमी

बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला करताच कुत्र्यांनी घेतली झेप; बलिदान दिलं पण मालकाला वाचवललं!
उंडणगाव : शेतात काम करत असलेल्या तरुणावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घातली. मात्र, याच वेळी शेतकऱ्याच्या दोन पाळीव कुत्र्यांनी बिबट्याच्या दिशेने धाव घेतली. त्यामुळे तरुण सावध झाला. त्याचे लक्ष बिबट्याकडे गेले आणि सुदैवाने तो बचावला. मात्र, बिबट्याच्या हल्ल्यात एक कुत्रा मारला गेला, तर दुसरा जखमी झाला. शनिवारी (दि. २२) सकाळी घडलेल्या या घटनेने उंडणगाव शिवारात एकच खळबळ उडाली.
उंडणगाव येथील शेतकरी नीलेश महाजन यांच्या गट क्र. ७७०मधील शेतात शनिवारी सकाळी सुनील नरवडे हा तरुण काम करत होता. महाजन यांच्या केळीच्या बागेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने सुनीलवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याच वेळी त्यांचे कुत्रे बिबट्यावर धावून गेले. त्यामुळे बिबट्याला आपला मोर्चा कुत्र्यांच्या दिशेने वळवावा लागला आणि तरुण बचावला. बिबट्याने एक कुत्रा जखमी केला, तर दुसऱ्याला झाडावर घेऊन गेला. तरुणाने आरडाओरडा करताच बिबट्याने धूम ठोकली. त्यामुळे झाडावरील कुत्रा त्या खालील विहिरीत पडला आणि त्यात मरण पावला. ग्रामस्थांनी माहिती दिल्यानंतर वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी येऊन पाहणी केली. नागरिकांनी सावध राहण्याचे तसेच रात्रीच्या वेळी एकटे शेताकडे न जाण्याचे आवाहन अजिंठा वनविभागाने केले आहे.
तरुणाची आपबिती...
केळीच्या बागेत ठिबक सिंचनचा कॉक फिरवण्यासाठी गेलो असता तेथे दबा धरून बसलेल्या बिबट्याने माझ्यावर हल्ला केला. हे मी पाहिलेच नव्हते, पण माझ्यासोबत असलेल्या कुत्र्याने जोरात भुंकत बिबट्याच्या दिशेने झेप घेतली आणि मी सावध झालो. बिबट्या पाहून अंगाचा थरकाप उडाला. कुत्र्यामुळे माझ्यावरचे लक्ष हटले आणि वाचलो. पण, कुत्रा मरण पावला.
- सुनील नरवडे
परिसरात बिबट्याची दहशत
उंडणगाव परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. शनिवारी तरुणावर झालेल्या हल्ल्यामुळे ग्रामस्थ, शेतकऱ्यांत भीती निर्माण झाली असून शेतात जाण्यास कोणीही धजावेना. वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी केली जात आहे.