'इम्तियाज जलीलांना अटक करा'; छत्रपती संभाजीनगरात जनआक्रोश मोर्चातून आंदोलकांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 15:56 IST2025-06-23T15:55:47+5:302025-06-23T15:56:52+5:30
क्रांती चौक येथून निघून मोर्चाचा समारोप भडकल गेट येथे झाला.

'इम्तियाज जलीलांना अटक करा'; छत्रपती संभाजीनगरात जनआक्रोश मोर्चातून आंदोलकांची मागणी
छत्रपती संभाजीनगर : माजी खा. इम्तियाज जलील यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला; परंतु पोलिसांनी त्यांना अद्याप अटक केली नाही. त्यांना अटक करावी या मागणीसाठी आंबेडकरी अनुयायांच्या वतीने आज, सोमवारी ( दि. २३ ) छत्रपती संभाजीनगरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. क्रांती चौक येथून निघून मोर्चाचा समारोप भडकल गेट येथे झाला.
माजी खा. जलील यांनी ११ जून रोजी पत्रकार परिषदेत अपशब्दाचा वापर करून बौद्ध समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांच्यावर क्रांती चौक, बेगमपुरा, उस्मानपुरा पोलिस ठाणे आदी ठिकाणी ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत; परंतु त्यांना अद्यापही अटक करण्यात आली नसल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर अन्याय, अत्याचारविरोधी कृती समितीच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. मोर्चास आज दुपारी १२ वाजता क्रांती चौक येथून सुरुवात झाली. मोर्चात वाळूज महानगरातील बजाजनगर, वाळूज, पंढरपूर, वडगाव (को.), घाणेगाव, रांजणगाव, करोडी, साजापूर, तीसगाव, जोगेश्वरी, शहरातील क्रांतीनगर, उस्मानपुरा, इंदिरानगर, गारखेडा, संसारनगर, समतानगर आदी वस्त्यांमधून व कन्नड, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, फुलंब्री, पैठण, वैजापूर, लासूर स्टेशन, करमाड आदी ठिकाणचे हजारो आंदोलक निळा झेंडा खांद्यावर घेऊन सहभागी झाले. तर अनेकांच्या हातात इम्तियाज जलील यांच्या अटकेची मागणी करणारे फलक होते. मोर्चाचे एक टोक पैठण गेट तर शेवटचे टोक क्रांती चौकात होते. सिल्लेखाना, गुलमंडीमार्गे जाऊन भडकल गेट येथे मोर्चाचा समारोप झाला.
जलील यांच्यावर नेत्यांची सडकून टीका
मोर्चाचे भडकल गेट येथे सभेत रूपांतर झाले. यावेळी शहरातील विविध आंबेडकरी नेत्यांनी माजी खा. इम्तियाज जलील यांच्यावर सडकून टीका केली. जलील यांनी आंबेडकरी समाजाबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले, समाजाने पैशांसाठी मते विकल्याचे म्हणत वारंवार अवमान केला, आमदार-खासदार असताना दलित वस्तीच्या निधीत जलील यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोपही नेत्यांनी केला. तर आंदोलकांनी ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात जलील यांना तत्काळ अटक करावी अशी जोरदार मागणी केली.
मोर्चाच्या मागे पालकमंत्री शिरसाट, माजी खा. इम्तियाज जलील यांचा आरोप
सरकारी कागदपत्रांमध्ये जे नमूद आहे त्याचेच वाचन मी केले. हे सर्व प्रकरण पालकमंत्री शिरसाट यांच्या भ्रष्टाचाराचे आहे. यावर कोणी बोलायला तयार नाही. मी कोणत्याही समाजाचा अवमान केला नाही. मोर्चातील गर्दी पैसे देऊन आणलेली आहे, याच्या मागे पालकमंत्री शिरसाट असल्याचा आरोप माजी खा. इम्तियाज जलील यांनी मोर्चावरील प्रतिक्रिया देताना केला.