मनपा, एमएसआरडीसीच्या वादात क्रांतीचौक उड्डाणपूल खड्ड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:42 IST2017-10-07T00:42:59+5:302017-10-07T00:42:59+5:30
जालना रोडवरील क्रांतीचौकातील उड्डाणपुलावरील खड्डे मनपा आणि एमएसआरडीसीच्या वादामुळे जीवघेणे होऊ लागले आहेत.

मनपा, एमएसआरडीसीच्या वादात क्रांतीचौक उड्डाणपूल खड्ड्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जालना रोडवरील क्रांतीचौकातील उड्डाणपुलावरील खड्डे मनपा आणि एमएसआरडीसीच्या वादामुळे जीवघेणे होऊ लागले आहेत. तो पूल उभारणीपासून वादग्रस्त राहिलेला आहे. पुलाचे दोन पिलर्स पाडून नव्याने बांधावे लागण्यापासून, तर पुलाच्या गुणवत्तेबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित केले गेले. शहरातील अतिशय निकृष्ट व दर्जाहीन असलेला तो पूल असून, त्यावरील डांबरीकरण मागील तीन वर्षांत वारंवार
उखडत आहे. पुलावरील धोकादायक वळण असलेल्या भागावरच खड्डे पडल्यामुळे वाहन चालविताना चालकाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
५ वर्षांतच तो पूल २५ वर्षे जुना असल्यासारखे वाटू लागले आहे. पुलावरील सरफेस उखडून गेला असून, काँक्रीटीकरण केलेल्या पृष्ठभागावरील लोखंड मध्यंतरी उघडे पडले होते. त्यावर सिमेंटचा थर टाकण्यात आला. त्यामुळे पुलावर स्पीडब्रेकर निर्माण झाले. पुलावरील वळण अतिशय धोकादायक असल्यामुळे त्याला दोन्ही बाजूंच्या आतील दिशेने बॅरिकेडस् लावून सुरक्षा कठड्यांची उंची वाढविण्यात आली. त्या वळणामुळे झालेल्या बहुतांश अपघातात अनेकांचे प्राण गेले आहेत.