दानवेंचे आरोप बालिशपणाचे, अब्रूनुकसानीचा दावा करणार; ११५० कोटींच्या घोटाळ्यावर भुमरेंचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 13:09 IST2026-02-25T13:02:52+5:302026-02-25T13:09:13+5:30
'अंबादास दानवेंचे मानसिक संतुलन बिघडले'; ११५० कोटींच्या आरोपावर संदिपान भुमरे कडाडले!

दानवेंचे आरोप बालिशपणाचे, अब्रूनुकसानीचा दावा करणार; ११५० कोटींच्या घोटाळ्यावर भुमरेंचे प्रत्युत्तर
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गालगतच्या जमिनीच्या मोबदल्यावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरे यांच्यावर ११५० कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपांना प्रत्युत्तर देताना खासदार भुमरे यांनी हे आरोप फेटाळून लावत दानवेंविरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे.
काय आहे अंबादास दानवेंचा आरोप?
अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत खळबळजनक दावा केला की, जटवाडा-जोगवाडा शिवारातील गट क्रमांक १७४ मधील २३ एकर ३ गुंठे जमीन, जिची किंमत सुमारे ११५० कोटी रुपये आहे, ती हडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. दानवेंच्या मते, खासदार संदीपान भुमरे यांचा चालक जावेद रसूल शेख याच्या नावावर १९७१ मध्ये 'हिबानामा' (मुस्लिम कायद्यानुसार बक्षीस पत्र) करून ३ एकर जमीन लाटण्यात आली. दानवेंनी सर्वात मोठा तांत्रिक मुद्दा उपस्थित केला की, "जावेदचा जन्म १९८५ चा आहे, मग त्याच्या जन्माच्या १४ वर्षे आधी म्हणजेच १९७१ मध्ये त्याच्या नावावर जमीन कशी आली?" या प्रकरणाची सीआयडी (CID) चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
संदीपान भुमरेंचे सडेतोड प्रत्युत्तर
या आरोपांना उत्तर देताना संदिपान भुमरे म्हणाले की, "अंबादास दानवेंचे संतुलन बिघडले आहे. ज्याचा जन्मच झाला नव्हता त्याच्या नावावर जमीन कशी येईल? हा केवळ माझी प्रतिमा मलिन करण्याचा कट आहे." भुमरे यांनी दावा केला की, ज्या १७४ गट क्रमांकाचा उल्लेख दानवे करत आहेत, तो गट अस्तित्वातच नाही. "हिबानामा मुस्लिम कायद्यानुसार होतो, मग हिंदू महिलेने असा व्यवहार कसा केला? हा निव्वळ संभ्रम आहे. दानवेंनी केलेल्या या बालिश आरोपांविरुद्ध मी न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा करणार आहे," असा घणाघात भुमरे यांनी केला.
प्रशासनाची भूमिका
या वादात उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांनी स्पष्ट केले आहे की, १७४ या गटातून कोणतेही भूसंपादन झालेले नाही आणि तो गट देखील रेकॉर्डवर अस्तित्वात नाही. त्यामुळे मावेजा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. प्रशासनाच्या या खुलाशामुळे आता दानवेंच्या आरोपांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे, तर दुसरीकडे राजकीय कलगीतुरा अधिकच रंगण्याची चिन्हे आहेत.