'२५०० कोटींचे टेंडर अन् इंजिनिअर्सचं राजकारण!' PWD घोटाळ्यावर अंबादास दानवेंचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 15:48 IST2026-02-14T15:48:06+5:302026-02-14T15:48:42+5:30
PWD मध्ये २५०० कोटींचा टेंडर घोटाळा? अंबादास दानवेंची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशीची मागणी

'२५०० कोटींचे टेंडर अन् इंजिनिअर्सचं राजकारण!' PWD घोटाळ्यावर अंबादास दानवेंचा गौप्यस्फोट
छत्रपती संभाजीनगर: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने (ठाकरे गट) आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "आम्ही कोणालाही पाठिंबा देणार नाही, मात्र कोणाला आम्हाला पाठिंबा द्यायचा असेल तर तो आम्ही स्वीकारू," अशा शब्दांत अंबादास दानवे यांनी शिवसेनेची निर्णायक भूमिका मांडली. आज आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राजकीय समीकरणांसह प्रशासकीय भ्रष्टाचारावर कडक ताशेरे ओढले.
सार्वजनिक बांधकाम विभागातील (PWD) अभियंते राजकारणात हस्तक्षेप करत असल्याचा गंभीर आरोप दानवे यांनी केला. २५०० कोटींपेक्षा जास्त रकमेच्या टेंडरमध्ये तांत्रिक त्रुटी असून यामुळे राज्याचे नुकसान होत आहे. या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच मंत्रालयात एक मोठी भ्रष्ट साखळी कार्यरत असून फूड अँड ड्रग्स विभागातही हस्तक्षेप वाढल्याचे त्यांनी नमूद केले.
शेतकरी कर्जमाफीसाठी आमदार उपोषणाला बसणार?
राज्याची आर्थिक स्थिती कमकुवत असली तरी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका दानवे यांनी मांडली. सरकार फक्त घोषणा करते पण अंमलबजावणी शून्य आहे. शेतकऱ्यांच्या या प्रश्नासाठी पक्षाचे आमदार उपोषणाला बसण्याचे संकेतही त्यांनी दिले.
महापालिकेतील टँकर घोटाळ्यावर प्रहार
प्रशासकीय कालावधीत महानगरपालिकेत टँकर व्यवहारात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला. या व्यवहाराचे तातडीने ऑडिट करण्याची मागणी करत त्यांनी नवनिर्वाचित महापौरांना संधी देण्याचे आवाहन केले. "नवे महापौर चांगले काम करतील, असा आम्हाला विश्वास आहे," असेही ते म्हणाले.
इतर महत्त्वाचे मुद्दे:
वनविभाग: वनविभाग हे आता दलालांचे केंद्र बनले असून गणेश नाईक यांनी मांडलेल्या मुद्द्यांची गांभीर्याने दखल घ्यावी.
रोहित पवार: रोहित पवार यांनी मांडलेल्या शंकांची चौकशी झाली पाहिजे, या विषयावर अजित पवार गटाचे नेते गप्प का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
टिपू सुलतान वाद: टिपू सुलतान हे महापुरुष नव्हते, मग त्यांचा फोटो कशासाठी? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी मालेगाव प्रकरणावर भाष्य केले.