"खरेदी का केली नाही?" अजिंठ्यात विक्रेत्याचा राडा; १७ परदेशी पर्यटकांसमोर गाईडला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 16:33 IST2026-02-23T16:32:51+5:302026-02-23T16:33:49+5:30
अजिंठा लेणीसारख्या ऐतिहासिक वारसा स्थळी पर्यटकांचा अनुभव सुखद राहणे आवश्यक असताना, अशा घटनांमुळे व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

"खरेदी का केली नाही?" अजिंठ्यात विक्रेत्याचा राडा; १७ परदेशी पर्यटकांसमोर गाईडला मारहाण
छत्रपती संभाजीनगर: अजिंठा लेणी परिसरात एका गाइडला स्थानिक विक्रेत्याकडून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी घडली. या वेळी गाइडसोबत १७ परदेशी पर्यटकांचा गट होता. पर्यटकांचे विमान असल्याने त्यांना वेळेत विमानतळावर पोहोचवण्यासाठी गाइड प्रयत्नशील होता. मात्र पर्यटकांनी खरेदी न केल्याचा राग आल्याने विक्रेत्याने वाद घालून गाइडला मारहाण केल्याची चर्चा परिसरात आहे.
संबंधित गाइडसोबत सकाळी परदेशी पर्यटक अजिंठा लेणी पाहण्यासाठी आले. लेणी पाहून झाल्यानंतर दुपारी २ वाजता पर्यटकांना पुढील प्रवासासाठी वेळेचे बंधन होते. विमानाची वेळ जवळ आल्याने ते लेणीतून निघाले. दरम्यान, लेणी परिसरातील शॉपिंग प्लाझातील काही विक्रेते पर्यटकांना हस्तकला व इतर वस्तू खरेदी करण्यासाठी आग्रह करत होते. मात्र वेळेअभावी पर्यटकांनी खरेदी टाळल्याने एक विक्रेता संतप्त झाला.
'गाइडमुळेच पर्यटकांनी खरेदी केली नाही', असा आरोप करत त्याने गाइडशी वाद घातला. हा वाद वाढत जाऊन हातघाईवर आल्याचे सांगितले जाते.
व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
अजिंठा लेणीसारख्या ऐतिहासिक वारसा स्थळी पर्यटकांचा अनुभव सुखद राहणे आवश्यक असताना, अशा घटनांमुळे व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. पर्यटक, गाइड आणि विक्रेते यांच्यात समन्वय राखण्यासाठी स्पष्ट नियमावली व नियंत्रण यंत्रणा प्रभावीपणे राबवण्याची मागणी होत आहे.
योग्य उपाय गरजेचा
विमानतळावर पोहोचायचे होते. 66 त्यामुळे पर्यटक निघाले. परंतु गाइडमुळेच पर्यटकांनी खरेदी केली नाही, असे वाटून विक्रेत्याने मारहाण केली. येथे वारंवार असे प्रकार होतात. यंत्रणेने उपाय केला नाही तर लेणीत जाणे बंद करू.
भरत जोशी, अध्यक्ष, गाइड वेल्फेअर असोसिएशन
प्रशासनाची भूमिका काय?
घटनेबाबत पोलिसांत तक्रार झालेली नव्हती. मात्र भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, एमटीडीसी विभागाने याची गंभीर दखल घेऊन परिसरातील विक्रेते व गाईड यांच्यात समन्वय साधण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.