दीडपट पावसामुळे शेती पाण्यात; तब्बल ४ लाख हेक्टरवर पिकांचा चिखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 13:25 IST2020-10-24T13:22:54+5:302020-10-24T13:25:34+5:30
यंदा खरीप हंगामाचे जिल्ह्यातील क्षेत्र सहा लाख ७० हजार हेक्टरच्या आसपास आहे.

दीडपट पावसामुळे शेती पाण्यात; तब्बल ४ लाख हेक्टरवर पिकांचा चिखल
औरंगाबाद : जिल्ह्यातील सुमारे ४ लाख हेक्टरवरील पिकांचा चिखल झाला असून, शेतात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पीक नुकसानीच्या पंचनाम्याचा अहवाल शासनाकडे पाठविला असून, शेतकऱ्यांना सुमारे १९२ कोटी रुपयांची मदत लागेल, असे अहवालात नमूद केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यंदा खरीप हंगामाचे जिल्ह्यातील क्षेत्र सहा लाख ७० हजार हेक्टरच्या आसपास आहे. भात, ज्वारी, बाजरी, मका मिळून १ लाख ९९ हजार हेक्टर, तूर, मूग, उडीद हे कडधान्य मिळून ४८ हजार हेक्टर, भुईमूग, तीळ, कारळ, सूर्यफूल, सोयाबीन २ लाख हेक्टरवर, तर ३ लाख ९९ हजार हेक्टरवर कापूस आणि ३ हजार ६५२ हेक्टवर ऊस होता. सुमारे ७० टक्के पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. ७ जून ते २३ ऑक्टोबरपर्यंत सरासरीच्या तुलनेने ५५ टक्के अधिक पाऊस झाला. औरंगाबाद तालुका २०० टक्के पाऊस होण्याच्या उंबरठ्यावर आहे. गेल्या वर्षीच्या सरासरीइतकीच पावसाची नोंद यंदा झाली होती. औरंगाबाद तालुका १९४ टक्के, फुलंब्री १३० टक्के, पैठण १८० टक्के, सिल्लोड १६० टक्के, सोयगाव १४२ टक्के, कन्नड १३५ टक्के, वैजापूर १८६ टक्के, गंगापूर १६७ टक्के, खुलताबादमध्ये १२२ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
दीडपट पावसामुळे नुकसान
१५५ टक्क्यांच्या आसपास पूर्ण जिल्ह्यात पाऊस झाला आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या तुलनेत आजवर ६६० मि.मी. पाऊस होणे अपेक्षित होते. आजवर १०५१ मि.मी. पाऊस झाला आहे. मागच्या वर्षी २२ ऑक्टोबरपर्यंत १०४५ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. पावसाचे हे प्रमाण पाहता जिल्ह्यातील खरीप हंगामातील कापूस आणि कडधान्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट होत आहे.