गल्ली ते दिल्ली महायुतीचे सरकार; छत्रपती संभाजीनगरचा सर्वांगीण विकास वेगाने होणारच: राजेंद्र जंजाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 20:23 IST2026-02-11T20:22:09+5:302026-02-11T20:23:10+5:30
शहरासाठी जे काही चांगलं असेल ते शंभर टक्के केले जाणार

गल्ली ते दिल्ली महायुतीचे सरकार; छत्रपती संभाजीनगरचा सर्वांगीण विकास वेगाने होणारच: राजेंद्र जंजाळ
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर ते दिल्लीपर्यत आता महायुतीचे सरकार आहे. पहिल्यांदाच शहरवासीयांनी महायुतीला मोठा कौल दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहराचा सर्वागीण विकास केला जाईल. शहरासाठी जे काही चांगलं असेल ते शंभर टक्के केले जाणार असल्याचा विश्वास नवनिर्वाचित उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केला.
प्रश्न - शहराला अजूनही मूलभूत सोयी-सुविधांचीच कमतरता, याचे कारण?
जंजाळ - रस्ते, पाणी, ड्रेनेजचा प्रश्न जवळपास सुटत आला आहे. २०५० पर्यंत शहराला पाणीप्रश्न अजिबात भेडसावणार नाही. आज जरी शहरवासीयांना त्रास होत असला तरी भविष्यात दररोज मुबलक पाणी मिळेल. वर्षभरात शहर स्वच्छ व सुंदर होईल. देशातील टॉप टेन शहरांमध्ये छत्रपती संभाजीनगरचा समावेश होईल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत केली जाईल.
प्रश्न - पर्यटनाची राजधानी निव्वळ नावालाच आहे, सुविधांचे काय?
जंजाळ - राज्याच्या पर्यटनाची राजधानी म्हणून या ऐतिहासिक शहराची ओळख जगभर आहे. पर्यटकांचा ओघ वाढला पाहिजे यासाठी महापालिका म्हणून जे काही करता येईल, ते केले जाईल. पर्यटकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणे तसेच शहराची मार्केटिंग जगभर केली जाणार आहे.
प्रश्न - महापालिकेतील बोकाळलेल्या भ्रष्टाचारावर तुमचे मत काय ?
जंजाळ - महापालिका आर्थिकदृष्ट्या कशी सुधारेल यावर अगोदर भर दिला जाईल. नागरिकांना किरकोळ कामासाठी वॉर्ड कार्यालय, मुख्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. जन्म-मृत्यू, बांधकाम परवानगी आदी अनेक नागरी सोयी सुविधा शंभर टक्के ऑनलाईन केल्या जातील. त्यामुळे भ्रष्टाचाराचा प्रश्नच राहणार नाही. कर लावणे, पाणीपट्टी आदी सर्व बाबी ऑनलाईन असतील.
प्रश्न - पाकिंग, फेरीवाल्यांचे प्रश्न सुटतील का?
जंजाळ - नवीन विकास आराखड्यानुसार शहरात ठिकठिकाणी पार्किंगसाठी आरक्षण टाकले आहेत. त्या जागांचे भूसंपादन करून पार्किंगची सुविधा देण्यात येईल. फेरीवाल्यांना जागा निश्चित करू. त्यासाठी सर्वसाधारण सभा धोरणात्मक निर्णय घेणार आहे.
प्रश्न - केंद्र, राज्याकडून मुबलक निधी येईल का?
जंजाळ - केंद्र आणि राज्यात महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे विकास कामांसाठी निधीची कमतरता राहणार नाही. महापौर समीर राजुरकर यांचाही शहराचा अभ्यास आहे. दोघे मिळून विकास कामांचे निर्णय झटपट घेऊ. शासन भरभरून द्यायला तयार आहे, आपल्या घेण्याचीही तेवढीच तयारी असायला हवी.