९५ हजार कोरोना प्रतिबंधक डोस शिल्लक, लाभार्थी पुढे येईनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2021 19:06 IST2021-10-19T19:01:47+5:302021-10-19T19:06:00+5:30
Corona Vaccine: अनेकांनी पहिला डोस घेतला. पण, दुसऱ्या डोस घेण्याचा कालावधी लोटला, तरी ते येण्यास तयार नाहीत.

९५ हजार कोरोना प्रतिबंधक डोस शिल्लक, लाभार्थी पुढे येईनात
औरंगाबाद : चार महिन्यांपूर्वी शहरात कोरोना प्रतिबंधक लसींचा प्रचंड ( Corona Vaccine ) तुटवडा जाणवत होता. त्यामुळे सीएसआर फंडातून महापालिकेने ( Aurangabad Municipal Corporation ) १ लाख १५ हजार डोस मिळविले होते. सध्या महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे ९५ हजार ४२० डोस शिल्लक आहेत. त्यानंतरही नागरिक लस घेण्यासाठी पुढे येण्यास तयार नाहीत. अनेकांनी पहिला डोस घेतला. पण, दुसऱ्या डोस घेण्याचा कालावधी लोटला, तरी ते येण्यास तयार नाहीत. त्यामुळे शहरात मनपाकडून व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.
शहरातील प्रत्येक नागरिकाला कोरोनाचे दोन डोस दिलेच पाहिजेत. यादृष्टीने महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. राज्य शासनाच्या आदेशानुसार ‘मिशन कवच कुंडल’ मोहीम राबविण्यात आली. ३० हजार लाभार्थ्यांना पहिला व दुसरा हे दोन्ही डोस देण्यात आले. मनपाने शहरातील विविध खासगी रुग्णालयांमध्येही मोफत लसीची सुविधा सुरू केली. यानंतरही औरंगाबादकरांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळायला तयार नाही. एकूण ८२ लसीकरण केंद्रे सुरू आहेत. १० लाख ५५ हजार ६०० नागरिकांना दोन डोस देण्याचे उद्दिष्ट मनपला दिले आहे. ५ लाख ७८ हजार ५१८ जणांनी पहिला, तर ३ लाख ३६ हजार ५१६ नागरिकांनी दुसरा डोस घेतला. दोन्ही डोसची संख्या ९ लाख १५ हजार ३४ एवढी आहे. नागरिकांनी लस घेण्यासाठी पुढे यावेत म्हणून धर्मगुरूंशी चर्चा, मशीदमध्ये नमाज झाल्यानंतर आवाहन, रेल्वे स्टेशन, बसस्थानक, घंटागाडीवर आवाहन करण्यात येणार आहे. नवरात्रोत्सवात मंदिरांमध्ये लसीची व्यवस्था केली. उपवासामुळे अनेक भाविकांनी लस घेण्यास नकार दिला. त्यामुळे शहरात होर्डिंग आणि व्यापक जनजागृती करण्यात येणार असल्याचे डॉ. मंडलेचा यांनी नमूद केले.
कोरोना लसीकरणावर एक दृष्टिक्षेप
१०,५५,६००- उद्दिष्ट
५, ७८, ५१८- पहिला डोस
३, ३६, ५१६- दुसरा डोस
९,१५, ३४- एकूण डोस
४,७७,०८२- दुसरा डोस न घेतलेले
८६.६८- एकूण लसीची टक्केवारी
९५,४२० - डोस मनपाकडे शिल्लक
०.२२ टक्के- डोस खराब होण्याचे प्रमाण