६ नव्हे ४ पदरीच होणार बीड बायपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 00:26 IST2018-07-05T00:23:24+5:302018-07-05T00:26:45+5:30
बीड बायपास हा रोड सध्या अपघात रोड म्हणून ओळखला जात आहे. या रोडचे रुंदीकरण तातडीने होणे महत्त्वाचे असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

६ नव्हे ४ पदरीच होणार बीड बायपास
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : बीड बायपास हा रोड सध्या अपघात रोड म्हणून ओळखला जात आहे. या रोडचे रुंदीकरण तातडीने होणे महत्त्वाचे असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे. महापालिका, नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडिया (एनएचएआय) आणि सार्वजनिक बांधकाम विभाग सोयीनुसार त्या रोडच्या बाबतीत घोषणा करीत आहे. या सगळ्या चक्रव्यूहात निष्पाप नागरिकांचे अपघाती बळी जात आहेत. ६० वरून ३० मीटरपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे निश्चित झाले असले तरी त्याला मुहूर्त केव्हा लागणार असा प्रश्न आहे.
त्या रोडचा ३८९ कोटी रुपयांचा रुंदीकरणाचा डीपीआर (डिटेल प्रोजक्ट रिपोर्ट/ सविस्तर प्रकल्प अहवाल) होता. आता त्याला १२५ कोटी रुपये देण्याचे अंतिम झाले आहे. म्हणजे हा रोड सिमेंट काँक्रिटीकरणातून फक्त चौपदरी केला जाईल. झाल्टा फाटा ते महानुभाव आश्रम या १४ कि़ मी. अंतरात तो रोड होणार आहे. यावरील सर्व उड्डाणपूल रद्द झाल्यातजमा आहेत. २६४ कोटी रुपयांची कपात या रोडच्या प्रकल्पात करण्यात आली असली तरी १२५ कोटी जे द्यायचे आहेत, ते केव्हा देणार असा प्रश्न आहे. गेल्या महिन्यांत केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे पुण्यातून राज्यातील विविध प्रकल्पांची माहिती दिली. त्यावेळी त्यांना जालना रोड आणि बीड बायपास रुंदीकरण प्रकल्पाविषयी पत्रकारांनी छेडन्ले होते. त्यांनी औरंगाबादच्या प्रकल्पावर पुरेशी माहिती देणे टाळले. बीड बायपासचे काम केव्हा सुरू होणार याबाबतही त्यांनी काहीही माहिती दिली नाही. विरोधात प्रश्न विचारताच त्यांनी औरंगाबादकडून येणाऱ्या प्रश्नांना बगल देत आवरते घेतले होते.
सगळ्या बाबी बोलण्यापुरत्याच
मुकुंदवाडी रेल्वेस्टेशवर उड्डाणपुलाचे डिझाईन तयार करण्यात आले. बीड बायपास ते पुढे सोलापूर-धुळे हायवेला रस्ता जोडण्यासाठी पूल बांधण्यात येणार होता. यासाठी रेल्वे प्रशासनासोबत एनएचएआयची फक्त बोलणी झाली. जयभवानीनगरचा रोड चार वर्षांपासून होत नाही. नागरिकांची घरे पाडल्यानंतर तातडीने रोड होणे अपेक्षित होते.
तिन्ही उड्डाणपूल रद्दच
शिवाजीनगर रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलासाठी एमएसआरडीसीने पॅनल पूल बांधणीचे एक डिझाईन तयार केले होते. त्यानुसार देवळाई चौक आणि शिवाजीनगर रेल्वे क्रॉसिंग कनेक्ट करून वाहतूक सुरळीत करण्याचा विचार झाला होता. संग्रामनगर, एमआयटी आणि शिवाजीनगर-देवळाई चौकातील उड्डाणपूल आता रद्दच झाल्यात जमा आहेत.