प्रस्ताव आले ३५ हजार, विहिरी झाल्या अडीच हजार; मराठवाड्यात 'रोहयो'च्या कामांची गती मंदावली
By विकास राऊत | Updated: November 1, 2023 19:03 IST2023-11-01T19:02:04+5:302023-11-01T19:03:21+5:30
मराठवाड्यात येणारा उन्हाळा पाणीटंचाईचा असणार आहे.

प्रस्ताव आले ३५ हजार, विहिरी झाल्या अडीच हजार; मराठवाड्यात 'रोहयो'च्या कामांची गती मंदावली
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक सिंचन विहिरींच्या कामांचा टक्का घसरला आहे. दोन वर्षांत ३५ हजार प्रस्ताव आले, मात्र २ हजार ५५४ विहिरींचीच कामे पूर्णत्वाकडे गेली आहेत. २०२२ व २०२३ या दोन वर्षांसाठी ३५ हजार ६४६ प्रस्ताव आले, त्यापैकी ३२ हजार सिंचन विहिरींना तांत्रिक मान्यता दिली. ३१ हजार ८९१ विहिरींना प्रशासकीय मान्यता दिली आहे. दोन वर्षांत केवळ २ हजार ५५४ विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. मंजुरीसाठी धावपळ करणाऱ्यांनी काम पूर्ण करण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
मराठवाड्यात येणारा उन्हाळा पाणीटंचाईचा असणार आहे. नांदेड, हिंगोली जिल्हा वगळता सहा जिल्ह्यांतील पाणीपातळीवर कमी पर्जन्यमानाचा परिणाम झाला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सिंचनास मदत मिळण्यासाठी रोहयोतून वैयक्तिक सिंचन विहीर बांधण्याची योजना आणली.
छत्रपती संभाजीनगरमधून ८ हजार ५८८, जालना ३ हजार ४६३, बीड ७ हजार ९५२, परभणी ३ हजार ५८४, हिंगोली २ हजार ६५४, नांदेड ३ हजार १७१, लातूर ४ हजार ४९९ तर धाराशिवमधून १ हजार ७३५ प्रस्ताव आले होते.
कोणत्या जिल्ह्यात किती कामे?
छत्रपती संभाजीनगर ६८४
जालना ९६
बीड १२,
परभणी ५३४
हिंगोली ५१०
नांदेड २०
लातूर ३२१
धाराशिव ३७७
सार्वजनिक विहिरींच्या कामे धिम्या गतीने
दोन वर्षांत ४ हजार ९२३ सार्वजनिक विहिरींना मान्यता दिली. तर ४ हजार ५६७ विहिरींची स्थळ पाहणी केली. त्यापैकी ३ हजार ५२० विहिरींचे काम सुरू झाले आहे. त्यातील १ हजार ७२२ विहिरींनाच पाणी लागले. त्यातीलही ७५५ विहिरींचे काम पूर्ण झाले आहे.