१५० टन बटाटे मातीमोल भावात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 22:04 IST2018-12-13T22:03:43+5:302018-12-13T22:04:43+5:30
गुरुवारी जाधववाडीतील अडत बाजारात आग्ऱ्याहून तब्बल १५० टन जुन्या बटाट्याची आवक झाली. एक क्विंटल बटाट्याला २५० रुपये गाडीभाडे लागले अन् येथे तोच बटाटा ३०० रुपये क्विंटलने विक्री झाला. मातीमोल भावात बटाटा खरेदी करण्यासाठी सकाळी हजारो ग्राहक जमले होते. तरीही मोठ्या प्रमाणात बटाटे विक्रीविना पडून होते.

१५० टन बटाटे मातीमोल भावात
औरंगाबाद : गुरुवारी जाधववाडीतील अडत बाजारात आग्ऱ्याहून तब्बल १५० टन जुन्या बटाट्याची आवक झाली. एक क्विंटल बटाट्याला २५० रुपये गाडीभाडे लागले अन् येथे तोच बटाटा ३०० रुपये क्विंटलने विक्री झाला. मातीमोल भावात बटाटा खरेदी करण्यासाठी सकाळी हजारो ग्राहक जमले होते. तरीही मोठ्या प्रमाणात बटाटे विक्रीविना पडून होते.
आग्रा येथे बटाट्याचे शेकडो शीतगृह आहेत. तेथून देशभरात बटाट्याचा पुरवठा होतो. आजघडीला शीतगृहामध्ये हजारो टन बटाटे शिल्लक आहेत. नवीन बटाट्याची आवक सुरू झाल्याने शीतगृहचालकांनी जुने बटाटे शीतगृहातून बाहेर काढणे सुरू केले आहे. तेथे जागेवर फुकटात बटाटे मिळत आहेत. येथील अडत्यांना फक्त तेथून बटाटे आणण्याचे गाडीभाडे, हमाली द्यावी लागत आहे. व्यापारी मुजीब शेठ यांनी सांगितले की, आज जाधववाडीत १५० टन बटाट्याची आवक झाली. जुन्या बटाट्याचे वेफर्स, चिवडा तयार करता येत नाही. खाण्यास गोड असतात यामुळे या बटाट्याला मागणी कमी असते. आग्ºयाहून एका मालट्रकमध्ये २० टन बटाटे आणले जातात. २५० रुपये प्रतिक्विंटल गाडीभाडे लागले. येथे ३०० रुपये क्विंटलने बटाटे विक्री झाले. आज अडत बाजारात ३०० ते ६०० रुपये क्विंटलपर्यंत बटाटे विक्री झाले. यात ८० टक्के बटाटे हा ३०० रुपये क्विंटलने विक्री झाले.
इंदूरमध्ये नवीन बटाट्याची आवक सुरू झाली आहे. हे बटाटे वेफर्स, चिवडा करण्यासाठी उपयोगाचे असतात. मात्र, जागेवरच ८०० ते १ हजार रुपये प्रति क्विंटलने नवीन बटाटे विकले जात आहेत. सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात कमी भावातील जुने बटाटे शिल्लक आहेत. ते विक्री झाल्यानंतर नवीन बटाटे मागविण्यात येतील.